Sunday, June 22, 2025

मुंबईत अवजड वाहनांना रविवारी 'नो एन्ट्री'

मुंबईत अवजड वाहनांना रविवारी 'नो एन्ट्री'
मुंबई (प्रतिनिधी) : होळी, शिमग्याचा सण महाराष्ट्रभर साजरा केला गेला. कामानिमित्त मुंबई, पुणे अशा महानगरांमध्ये स्थानिक झालेले अनेक चाकरमानी शिमगोत्सवासाठी कोकणात निघाले होते. आता सण साजरा करुन चाकरमानी परतीचा प्रवास करणार आहेत. हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाने विशेष सोय केली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, उद्या रविवारी १६ मार्च रोजी मुंबई-गोवा महामार्गावर २४ तास अवजड वाहनांना बंदी असणार आहे. यासंबंधित अधिसूचना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आली आहे. वाहतूक बंदीतून इंधन, स्वयंपाकाचा गॅस, भाजीपाला, औषधे, ऑक्सिजन अशा जीवनाश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. उद्या मुंबई-गोवा महामार्गावर दुपारी १२ वाजल्यापासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार आहे. होळीसाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अवजड वाहतूकीवर बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.



होळी, शिमगा सण तसेच सलग आलेली सुट्टी यामुळे मागील काही दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होती. शिमग्याला गावाला जाणाऱ्या चाकरमान्यांच्या गाड्यांच्या रांगा महामार्गावर लागल्या होत्या. हा त्रास पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासनाने अधिकची खबरदारी घेतली आहे.
Comments
Add Comment