पुणे : लाखो रुपये खर्चून घर खरेदी केल्यानंतर आणि त्यावर पुन्हा हजारो रुपयांचा मिळकतकर भरुनही शहरातील लाखो पुणेकरांना पाण्यासाठी टॅंकरचाच आधार घ्यावा लागत आहे. गेल्या तीन वर्षात शहरात टॅंकरची मागणी तब्बल १ लाख फेऱ्यांनी वाढली आहे. मार्च २०२३ ते फेब्रुवारी २०२५ अखेर या अकरा महिन्यात शहरात तब्बल ४ लाख ४० हजार ३४० फेऱ्या झाल्या आहेत.
दरवर्षी ही मागणी वाढतच असून, हक्काच्या पाण्यासाठी आणखी किती दिवस वाट पहावी लागणार, असा सवाल आता नागरिक करत आहेत. शहरातील अनेक सोसायटयांना महापालिकेचे पुरेसे पाणी येत नसल्याने दररोज १० ते १२ टॅंकर पाणी घ्यावे लागत आहे.
या टॅंकरचे दर महापालिकेने निश्चित करून दिले असले तरी, अनेक टॅकरचालकांकडून पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते अडीच हजार रुपयांची आकरणी केली जात असल्याचे शहरभर चित्र आहे.