अमरावती : दरवर्षी महाशिवरात्रीपासून ते गुढीपाडव्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर साखरगाठी बनविल्या जातात. सध्या परतवाडा येथे जोरात गाठ्या बनवण्यास वेग आल्याचे दिसते. वाढत्या महागाईमुळे याच साखरगाठीच्या किंमती गगनाला भिडल्याचे चित्र आहे. साखर आणि मजुरीच्या दरात मोठी वाढ झाल्याने यंदा साखरगाठी हाराच्या दरात सुमारे चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ऐन होळी, गुडीपाडवा सणात सर्व सामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाईने उच्चांक गाठला असून त्याचा फटका साखर गाठीहार तयार करणाऱ्या व्यवसायिकांना देखील बसला दरवाढीनी गाठीची मोडी ठरविली आहे. साखरे बरोबरच इतर कच्या मालाच्या दरात दुप्पट-तीप्पट वाढ झाली आहे. त्यातच गुजरातमधून आलेल्या साखरगाठीचाही स्थानिक व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. होळीला अर्पण करुन लहान मुलांना रंगपंचमीच्छा दिवशी गुलाल लावून ही गाठी घालण्याची पद्धत आहे. मराठी नववर्ष दिन म्हणजेच गुढीपाडवा आता काही दिवसांवर आलाय. घरोघरी त्याची तयारी सुरू झाली.
गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याबरोबरच साखरगाठीचं महत्त्व आहे. विशेषतः घरातील लहान मुलांना या साखरगाठींचा हार आवर्जून देण्यात येतो. त्याचबरोबर देवाला आणि गुढीलाही ही साखरगाठी अर्पण केली जाते. या काळात लग्न ठरलेल्या व लग्न झालेल्या नववधुला गाठी व साडीचोळी देण्याची प्रथा पुर्वीपासुन आज ही चालु आहे. त्यामुळे गाठीचे अधिक महत्व असले तरी महगाईने मात्र नागरीकांना हैराण केले आहे. त्यामुळे या होळीत आणि पुढीपाडव्याला याचा आर्थिक फटका नागरीकांना सहन करावा लागणार आहे.