मुंबई : “एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेले यापूर्वीचे सर्व निर्णय हे महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून घेतलेले आहेत ती आमची सामुहिक जबाबदारी आहे त्या निर्णयांना एकटे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे जबाबदार नाहीत त्यामुळे त्यांच्या कोणत्याही विकास प्रकल्पांना मी स्थगिती देत नाही,कारण मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नाही,” अशा परखड व रोखठोक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी राज्यपालांच्या अभिभाषणांवरील विधानसभेत चर्चेला दिलेल्या उत्तरात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्याचवेळी त्यांनी असेही स्पष्ट केले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मी स्वतः आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही निर्णय प्रक्रियेत सामील होते.त्यामुळे कोणत्याही निर्णयाची जबाबदारी केवळ शिंदेंची नसून तर आमच्या तिघांची आहे. “मंत्रालयीन किंवा विभागीय स्तरावर काही ठराव स्थगितीला गेले असले तरी ते माझ्या आदेशावर नव्हे, मात्र तरीही माध्यमांमध्ये माझ्याविरोधात चुकीची माहिती पसरवली जाते,” असेही त्यांनी यावेळी विरोधकांना ठणकावून सांगितले.
चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांनी काही प्रतिक्रिया दिली असता, देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) त्यांना चिमटा काढत म्हटले, “जयंतराव, तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असता! तुम्ही ना अजितदादांचे ऐकता, ना माझे!” या वाक्यावर सभागृहात हशा पिकला. त्यानंतर त्यांनी सुरेश भट यांच्या ओळी उद्धृत करत वातावरण अधिकच रंगतदार केले.
विरोधकांना लक्ष्य करताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “महाराष्ट्रातील काही नेते सतत गुजरातला पुढे ठेवतात, त्यामुळे आता गुजरातला स्वतःची जाहिरात करण्याचीही गरज नाही. पण त्यांनी हे लक्षात ठेवावे की, गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक परकीय गुंतवणूक फक्त ९ महिन्यांत महाराष्ट्राने मिळवली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत महाराष्ट्रात तब्बल १,३९,४३४ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. हा आकडा गुजरात, दिल्ली आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षाही अधिक असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेत महाराष्ट्राने भव्य गुंतवणूक आकर्षित केली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठासून सांगितले. “जेव्हा एखादे राज्य १६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करते, तेव्हा त्याचा डंका संपूर्ण जगभर वाजतो.महाराष्ट्राच्या पॅव्हिलियनबाहेर उद्योगपतींची गर्दी होती. मात्र, विरोधक आम्हाला दोष देतात की आम्ही भारतीय कंपन्यांशीच करार केले. पण आदित्य ठाकरे जेव्हा दावोसला गेले होते, तेव्हाही बऱ्याच कंपन्या भारतीय होत्या. विशेष म्हणजे, त्यातील अनेक कंपन्या नंतर प्रकल्पातून माघारी गेल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात चर्चेला उत्तर देण्यासाठी येताना खास गुलाबी रंगाचे जॅकेट घालून आले होते. यावरून काही सदस्यांनी टोमणे मारले. यावरही फडणवीस मिश्किलपणे म्हणाले, “हे गुलाबी जॅकेट मला अजितदादांनीच शिवून दिलंय!” त्यांच्या या वक्तव्यावर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, महाराष्ट्र अजूनही औद्योगिक आणि आर्थिक आघाडीवर देशात पहिल्या स्थानावर आहे. “महाराष्ट्र उद्योग, रोजगार आणि परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत देशात क्रमांक एकवर आहे. त्यामुळे विरोधक कितीही नकारात्मकता पसरवत असले तरी सत्य वेगळे असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या उत्स्फूर्तपणे चर्चेला उत्तर दिल्याने विधानसभेत रंगतदार चर्चा रंगली. महाराष्ट्राच्या विकासावर सरकारचा भर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.