बेकरी शिष्टमंडळासह एमजीएलसोबत डॉ गगराणी यांनी घेतली बैठक
मुंबई : बेकऱ्या आणि त्यातील हॉटेलमधील तंदूरसाठी वापरण्यात येणार भट्टयांमध्ये कोळसा वापरण्यास बंदी आणल्यामुळे मुंबईतील बेकरी व्यवसायिकांमध्ये भीती निर्माण झाल्याने यासर्व बेकरी व्यवसायिकांच्या असोशिएशनची बृहन्मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांच्यासमवेत बैठक पार पडली.
या बैठकीत महानगर गॅस जोडणीसाठी आवश्यक असलेली अनामत रक्कम माफ केली जाणार असून तशी ग्वाही महानगर गॅसने दिली आहे. तसेच इंधन बदलल्यामुळे परवान्याचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता राहणार नाही. “परवान्यांचे नूतनीकरण प्राधान्याने केले जाईल. अन्न प्रक्रिया उपक्रमांच्या पंतप्रधान औपचारिकीकरण योजनेअंतर्गत व्यवसायाला ३० टक्के अनुदानही मिळेल,असे या बैठकीत नमुद करण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बेकरींना लाकूड आणि कोळशाच्या वापरावर बंदी घालणाऱ्या नोटिसा बजावल्यामुळे यासर्व पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी महानगर पालिका, महानगर गॅस यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आणि बेकरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्तांसमवेत बैठक घेण्यात आली. बेकरी असोसिएशनच्या समस्यांवर औपचारिक सुनावणी घेण्याचे आवाहन शेख यांनी महापालिका आयुक्त डॉ गगराणी यांना पत्र लिहिले होते, त्यानुसार ही बैठक घेवून त्यामध्ये काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
“पायाभूत सुविधांच्या कमतरतेबद्दल महानगर गॅसने सांगितले की. ते संपूर्ण शहराचे मॅपिंग करेल. जेणेकरून सध्याच्या पायाभूत सुविधा असलेल्या आणि पायाभूत सुविधांची कमतरता असलेल्या क्षेत्रांचे चिन्हांकन केले जाईल,” अशी माहिती आमदार रईस शेख यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. तसेच, ते पुढे म्हणाले की इंधन बदलल्यामुळे परवान्याचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता राहणार नाही. “परवान्यांचे नूतनीकरण प्राधान्याने केले जाईल. अन्न प्रक्रिया उपक्रमांच्या पंतप्रधान औपचारिकीकरण योजनेअंतर्गत व्यवसायाला ३० टक्के अनुदानही मिळेल.
महाराष्ट प्रदुषण नियामक मंडळ अर्थात एमपीसीबीही ते जुळवून घेईल. त्याच्या व्यवसायांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन या बैठकीत संबंधितांनी दिल्याचे शेख यांनी म्हटले आहे. महानगर गॅसने या जोडणीसाठी आवश्यक असलेली अनामत रक्कम अर्थात डिपॉझिट रक्कमही माफ केली आहे. “तसेच, महानगर गॅस लिमिटेड ही कंपनी बेकरींना डिझाइन आणि नियोजनात मदत करेल आणि भट्टीपर्यंत वाहिनी टाकून देईल. त्यामुळे या बेकरी व्यावसायिकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे,असेही, शेख यांनी सांगितले.