मुंबई : विरोधकांनी चहापाण्यावर बहिष्कार टाकला. नवीन सरकार स्थापन झाल्यावर चर्चा करून सकारात्मक भूमिका घ्यायला हवी. संवाद हे उपाययोजना काढण्याचे मोठे माध्यम आहे; मात्र विरोधकांनी संवादावरच बहिष्कार टाकला. संवादावर बहिष्कार टाकायचा आणि चर्चेची मागणी करायची हे भूमिका दुटप्पी आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करतील. राज्याचा अर्थसंकल्प अत्यंत समतोल प्रकारचा असेल. अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक योजनेला योग्य प्रकारे निधी दिला जाईल. लाडकी बहिण, तसेच अन्य कोणतीही योजना बंद केली जाणार नाही. विरोधकांची संख्या अल्प असली, तरी त्यांचे सर्व म्हणणे समजून घेतले जाईल. चर्चेला भरपूर संदी देऊन सकारात्मक चर्चा करू.
विरोधकांनी ९ पानांचे पत्र सरकारकडे सादर केले आहे. वृत्तपत्रांमधील बातम्यांच्या आधारे हे पत्र सादर करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्याविषयी कुणी चुकीचे बोलत असेल, तर त्यावर कारवाई होणारच; मात्र जे औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण केले, आतंकवादी इशरत जहाँ हिच्या नावेने रुग्णवाहिका चालू केली त्यांच्याकडून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे नाहीत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत. शासन १०० दिवसांच्या कामाचा आढावा घेणार आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या कामानुसार मूल्यांकन केले जाईल.
महिला सक्षमीकरण आणि राज्यघटना यांविषयी विशेष चर्चा होणार !
वर्ष २०२५ हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त ८ मार्च या दिवशी महिलांच्या सबळीकरणासाठी विशेष चर्चा केली जाईल. चालू वर्ष भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे राज्यघटनेने आपणाला काय दिले ? याविषयी २ दिवसांच्या चर्चेचे आयोजन करण्यात आली आहे. या चर्चेला विरोधकांकडून सकारात्मक प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
माध्यमांनी दोन्ही बाजू समजून घेऊन वृत्त द्यावे !
कोणत्याही आमदाराचे निवेदन आल्यास शासनाकडून त्याविषयी पडताळणी केली जाते. याचा अर्थ चौकशीचा आदेश होत नाही. त्यामुळे वृत्तपत्रांनी बातमी देतांना दोन्ही बाजू छापायला हव्यात; मात्र चुकीची वृत्ते देऊन वातावरण सिद्ध केले जाते. त्यामुळे त्याचे स्पष्टीकरण देण्यात वेळ जातो, हे माध्यमांनी समजून घ्यायला हवे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्याला पुढे नेण्याचा आमचा अजेंडा ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
राज्याला पुढे नेण्याचा आमचा अजेंडा आहे. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला अधिवेशनाध्ये उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत; मात्र विरोधकांनी द्वेषभावनेने टीका केली, तर त्यांना चोख उत्तर दिले जाईल.