चमौली : उत्तराखंडमधील (Uttarakhand) चमौली जिल्ह्यातील मानाजवळ शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर हिमस्खलन झाले. घटनास्थळी गेल्या ३० तासांपासून बचावकार्य सुरू आहे. लष्करी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इतरांसह किमान ४ जखमी कामगारांना मृत घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली.
हिमस्खलनात सीमा रस्ते संघटनेचे (बीआरओ) ५७ कामगार अडकले होते. त्यापैकी आतापर्यंत ४७ कामगारांना वाचण्यात यश आले असून, ५ जणांचा शोध सुरु आहे.
उत्तराखंडमधील चमोली येथे शुक्रवार २८ फेब्रुवारी रोजी सकाळी हिमस्खलन झाले. बद्रीनाथपासून ३ किलोमीटर अंतरावरील चमोलीच्या माना गावात ही घटना घडली. बर्फाचा ढिगारा कोसळला. हिमस्खलनात बर्फ हटवण्याच्या कामात गुंतलेले सीमा रस्ते संघटनेचे (बीआरओ) कामगार अडकले.
शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत ३३ जणांना वाचवण्यात यश आले. तर आज, शनिवारी सकाळी १४ जणांना बाहेर काढण्यात आले. तीन जखमी कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरद्वारे माना येथून जोशीमठ येथे गंभीर वैद्यकीय उपचारांसाठी हलविण्यात आले.
घटनास्थळी ३० तासांहून अधिक काळ बचावकार्य सुरू आहे. लष्करी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या इतरांसह किमान ४ जखमी कामगारांना मृत घोषित करण्यात आले आहे, लष्कर, आयटीबीपी, बीआरओ, एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे २०० हून अधिक सैनिक बचाव कार्यात गुंतले आहेत.