Monday, June 23, 2025

धर्म आणि अधर्म

धर्म आणि अधर्म

जीवन संगीत - सद्गुरू वामनराव पै


निसर्गाचे नियम किती व कुठले हा प्रश्न आम्हाला नेहमी विचारण्यात येतो. क्रिया तशी प्रतिक्रिया, जिथे परिणाम आहे तिथे कारण हे असतेच, जसा विचार तसा जीवनाला आकार, गुरुत्वाकर्षण शक्तीचा नियम, बहिर्मनाचा नियम, अंतर्मनाचा नियम असे अनेक निसर्गाचे नियम आहेत. हे निसर्गाचे नियम आपण समजून घेत नाहीत म्हणून माणसाचे जीवन कधीच सुखी झालेले नाही. सुख पाहता जवापाडे दुःख पर्वताएवढे असे होते. याचे कारण एके ठिकाणी डॉ. मर्फी म्हणतात, “मानसिक आणि आध्यात्मिक नियमांचे अज्ञान”, म्हणजेच मनोआध्यात्मिक नियमांबद्दलचे अज्ञान. म्हणून मानसिक व आध्यात्मिक नियम जे आहेत ते आणि त्याचा संबंध निसर्ग नियमांशी कसा आहे हे समजून घेतले पाहिजे. हे नियम आणि निसर्गाचे नियम यांचा माणसाच्या जीवनाशी थेट संबंध आहे. माणसाचे विचार बिघडले की जीवन बिघडते, भावना बिघडल्या की, जीवन बिघडते, संकल्प बिघडले की जीवन बिघडते, इच्छा बिघडल्या की जीवन बिघडते.


हे सर्व जर पाहिले तर मानसिक व आध्यात्मिक नियमांचे ज्ञान हे माणसाचे जीवन सुरळीत चालण्यासाठी किती आवश्यक आहे हे लक्षात येते. हे कुणीही आतापर्यंत सांगितलेले नाही. आपल्याला सांगितले जाते की, आपल्या हातात काही नाही. देवाची कृपा होते किंवा देवाचा कोप होतो म्हणून दानधर्म करा, यज्ञयाग करा, उपासतापास करा अशा अनेक गोष्टी करायला सांगितल्या जातात. प्रत्यक्षात यांचा मानवी जीवनाशी तसा काही संबंध नाही. जीवनविद्येने सिद्धांत मांडला, धर्म अधर्म कशाला म्हणतात? निसर्गाचे नियम पाळणे हाच धर्म व निसर्गाचे नियम लाथाडणे हा अधर्म. किती सोपे करून टाकले. जगातील सर्व लोकांनी निसर्गाचे नियम पाळायचे ठरविले तर आनंदी आनंद आहे. आम्ही तर असे प्रतिपादन करतो की, अखिल मानवजातीसाठी धर्म एकच असतो, ज्याप्रमाणे समुद्र अखिल मानवजातीसाठी एकच आहे त्याप्रमाणे, हा धर्म म्हणजेच जीवन धर्म. निसर्गाचे नियम सर्वांना सारखे म्हणून यात तुमचा देव, आमचा देव हे कुठून येणार? या ज्ञानाचा
तुमच्या जीवनाशी अत्यंत घनिष्ट संबंध येतो. जीवनविद्येने हे तत्वज्ञान इतके सोपे केले व व्यावहारिक केले.

Comments
Add Comment