दुबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या(ICC Champions Trophy 2025) सेमीफायनलमध्ये एंट्री घेतली आहे. सोबतच ग्रुप एमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचणाऱा दुसरा संघ न्यूझीलंड ठरला आहे. तर या ग्रुपमधील यजमान पाकिस्तान आणि बांगलादेशचा पत्ता मात्र कट झालाय.
ग्रुप ए मधून भारत आणि न्यूझीलंड हे संघ सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा निर्णय सोमवारी झाला. या दिवशी रावळपिंडीमध्ये न्यूझीलंड आणि बांग्लादेश यांच्यात करो वा मरोचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने ५ विकेटनी विजय मिळवला.
भारत आणि न्यूझीलंडने जिंकले प्रत्येकी २ सामने
या निकालासह भारतीय संघ आणि न्यूझीलंडचे संघ फायनलमध्ये पोहोचण्याचा निर्णय झाला आहे. खरंतर, या दोन्ही संघांनी आतापर्यंत आपल्या ग्रुपमधील २-२ सामने खेळले आहेत. दोन्ही सामन्यात या संघांनी विजय मिळवला. दुसरीकडे पाकिस्तान आणि बांगलादेशचे संघ आहेत. या दोन्ही संघानी प्रत्येकी दोन सामने खेळले आणि दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारला.
या पद्धतीने पॉईंट्सच्या आधारावर पाकिस्तान आणि बांगलादेशचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर झाले आहेत. तर भारतीय संघ आणि न्यूझीलंड संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला ६ विकेटनी हरवले. यानंतर पाकिस्तानलाही ६ विकेटनी हरवले होते.
ग्रुप एमध्ये आणखी दोन सामने खेळवले जातील. हे सामने औपचारिक असतील. या ग्रुपमधील पुढील सामना पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यातील असेल. २७ फेब्रुवारीला हा सामना रंगेल. तर ग्रुपमधील शेवटचा सामना भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यात असेल.