लासलगाव : नाशिक जिल्हा हा राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. निफाड आणि लासलगाव येथे कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. परंतु सध्या बाजारपेठेत कांद्याची आवक घटलेली दिसून येते.
घाऊक बाजारात जानेवारीत ८० ते ९० हजार मेट्रिक टन असलेली कांदा आवक फेब्रुवारीत की सुमारे २० टक्के म्हणजे १६ ते १८ हजार मेट्रिक टनांनी कमी झाली.परिणामी लाल कांदा दरात किलोमागे सात ते आठ रुपयांनी वाढ झाली आहे. जानेवारीत घाऊक बाजारात कांदा १५०० ते २००० रुपये प्रति क्विंटल होता. फेबुवारीच्या मध्यावर त्याला सरासरी २२०० ते २८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे महिनाभरात क्विंटलमागे झालेली सरासरी दरवाढ ७०० ते ८०० व किरकोळ बाजारात किलोमागे झालेली दरवाढ ७ ते ८ रुपये आहे.
विशेष म्हणजेऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे लाल कांद्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये ज्या तुलनेत कांदा बाजारात विक्रीसाठी येतो, त्यापैकी यंदा १५ ते २० टक्के आवक कमी आहे. जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्येही लाल कांदा सरासरी २१ ते २८ रुपये प्रति किलोने विक्री होत आहे. तर मंगळवारी लासलगाव बाजार समितीमध्ये ३० रुपये किलो सर्वाधिक दर मिळाला. भारतातून बांगलादेशात सर्वाधिक कांदा निर्यात होत असते. मात्र त्यासाठी बांगलादेशचे आयात शुल्क व भारतातून २० टक्के निर्यात शुल्क असल्याने देशात दर स्थिर ठेवण्यासाठी निर्यातमूल्य हटविण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, देशांतर्गत बाजारपेठेत आवक वाढून कांदा दर घसरण्याची शक्यता आहे. दर स्थिर ठेवण्यासाठी शासनाने निर्यातमूल्य हटविण्याची गरज आहे. तरच शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण कायम राहील, असे म्हटले जात आहे. गतवर्षी उन्हाळ कांद्याला समाधानकारक दर मिळतअसल्याने यंदा नाशिक विभागात दोन लाख ५६ हजार ८४७ हेक्टरवर रब्बी कांदा लागवड झाली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यात दोन लाख २४ हजार ३३० हेक्टर वर लागवड झाली आहे. त्यामुळे यंदा आवक ही अधिक रहाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांमध्ये केंद्र शासनाविरोधात नाराजी आहे. निर्यातशुल्क रद्द केल्यास दर वाढण्याची भिती असल्याने शासन शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकरी संघटना पदाधिकार्यांनी सांगितले