Saturday, June 28, 2025

कळवा पुलावर अखेर बसवली सुरक्षा साधने

कळवा पुलावर अखेर बसवली सुरक्षा साधने

२०२२ मध्ये लाेकार्पण झालेल्या या पुलावर संरक्षण कुंपण झाले तयार


ठाणे  : वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कळवा पुलावर अखेर सुरक्षा साधने बसविण्यात आले आहेत. मागील अनेक महिन्यांपासून येथील पुलावर सुरक्षा साधनांचे कुंपण नसल्याने पादचारी आणि वाहनांचे अपघात होऊन जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही सुरक्षा साधने गर्दुल्ल्यांनी चोरी केल्याचा संशय महापालिकेला होता. त्यामुळे आता येथे लोखंडी सुरक्षा साधने बसविण्यात आली आहेत. ठाणे शहरातून नवी मुंबई, मुंब्रा,कळवा, विटावा भागात वाहतुक करण्यासाठी कळवा खाडी पुलाची मार्गिका महत्त्वाची आहे. या मार्गावरून हजारो हलकी वाहने वाहतुक करतात. जुना कळवा पूल हा वाहतुकीसाठी अरुंद होता. त्यामुळे ठाणे महापालिकेने हा तिसरा नवा खाडी पूल बांधला होता. त्यासाठी महापालिकेने १८३ कोटी रुपये खर्च केले होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये या पुलाचे लोकार्पण झाले होते.



पुल उभारताना ठाणे महापालिकेने त्याचे सुशोभिकरण केले होते. तसेच उड्डाणपुलालगत एक पदपथ बनविण्यात आले होते. उड्डाणपुलाखालून ठाणे खाडी वाहते. त्यामुळे महाालिकेने सुरक्षेच्या दृष्टिने या पदपथालगत काच सदृष्य साधने बसवून सुरक्षा कुंपण तयार केले होते. तसेच उड्डाणपुलावर विद्युत रोषणाई देखील केली होती. विद्युत रोषणाई आणि इतका मोठा खाडी पूल ठाण्यात पहिल्यांदाच बनविल्याने पुलावर फेरफटका मारण्यासाठी आणि स्वयंचित्र, छायाचित्र काढण्यासाठी नागरिक दररोज पुलालगतच्या पदपथावर येऊ लागले होते. खरं तर सुरक्षेच्या दृष्टीने हा भाग अितशय महत्त्वाचा होता. याकडे मात्र दुर्लक्ष होत होते. त्यामुळे नागरिक त्रासले होते मागील काही महिन्यांपासून येथील सुरक्षा साधनांचे कुंपण चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. अपुऱ्या सुरक्षा साधनांमुळे फेरफटका मारण्यासाठी आलेले नागरिक खाडीत पडण्याची भिती व्यक्त केली जात होती. अखेर ठाणे महापालिकेने येथे नव्याने लोखंडी संरक्षण कुंपण बसविले आहे. पूर्वी प्रमाणे काच सदृश्य साधनांचा वापर यावेळी टाळण्यात आला आहे. सुरक्षा कुंपणांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment