रेल्वेला स्वस्त दरात वीज खरेदी करण्याची मिळाली संधी
मुंबई : भारतीय रेल्वेने (Indian Railway) वीज खरेदीत मोठा बदल करून मोठ्या प्रमाणात बचत केली आहे. २०१५ पासून मध्य रेल्वेने ‘ओपन अॅक्सेस’ प्रणाली स्वीकारून थेट स्वस्त वीज खरेदी करण्यास सुरुवात केली होती. या निर्णयामुळे मध्य रेल्वेच्या वीज खर्चात तब्बल ६ हजार ५ कोटी रुपयांची बचत झाली आहे. मध्य रेल्वे (Central Railway) हा निर्णय घेणारा पहिला विभाग ठरला असून, मागील १० वर्षांत त्याचा मोठा आर्थिक फायदा दिसून आला आहे.
Bank Scam : सावधान! ‘या’ सहकारी बँकांमध्ये तुमचे खाते आहे का?
पूर्वी भारतीय रेल्वे राज्य वीज मंडळे किंवा राज्य वीज वितरण कंपन्या यांच्याकडून वीज खरेदी करीत होती. महाराष्ट्रात या विजेचा दर तब्बल ९ रुपये प्रति युनिट होता. त्यामुळे रेल्वेच्या एकूण खर्चात मोठी वाढ झाली होती. मात्र, मध्य रेल्वेने ‘ओपन अॅक्सेस’मधून वीज खरेदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे ओपन अॅक्सेस प्रणालीमुळे रेल्वेला थेट वीज निर्मिती कंपन्याकडून किंवा बाजारातून स्वस्त दरात वीज खरेदी करण्याची संधी मिळाल्यामुळे महागड्या पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी झाले आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत शक्य झाली.
मध्य रेल्वेने २०१५ पासून ‘ओपन अॅक्सेस’मार्फत वीज खरेदी सुरू केली. त्यामुळे आता मध्य रेल्वेला १० वर्षांत रेल्वेच्या वीज खर्चात तब्बल ६ हजार ५ कोटी रुपयांची बचत झाली. ओपन अॅक्सेसमुळे वीज खरेदीचा दर ९ रुपयांवरून ५.५० ते ६.५० रुपये इतका कमी झाल्याने याचा थेट परिणाम रेल्वेच्या वीजबिलावर झाला. मध्य रेल्वेने वर्ष २०१५–१६ मध्ये रेल्वेने ७९४ दशलक्ष युनिट वीज वापरून १६१ कोटींची बचत केली होती. वर्ष २०१८–१९ मध्ये ही बचत ७१६ कोटी इतकी झाली. तर वर्ष २०२३–२४ मध्ये ती वाढून ७५२ कोटींवर पोहोचली.