बीकेसी ते वरळी भुयारी मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता
मुंबई : मुंबईकरांना आणखी एका मेट्रोचे गिफ्ट मार्च अखेरपर्यंत मिळू शकते. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने त्यांच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ भूमिगत मेट्रो-३ प्रकल्पाच्या बीकेसी- कुलाबा टप्प्याबाबत मोठी माहिती दिली आहे. या टप्प्याचे आतापर्यंत ९३.१ टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्च २०२५ अखेर प्रवासी सेवेसाठी ते सुरू करण्याचे लक्ष्य आहे. महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेतला. शंभर दिवसांच्या अजेंड्यामध्ये या विस्ताराचा समावेश करण्यात आला होता. मार्च अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून बीकेसी – वरळी भुयारी मेट्रो मार्गिकेचे संचलन केले जाण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रोच्या या महत्त्वाच्या टप्प्यात असलेल्या बीकेसी-आचार्य अत्रे चौक आणि वरळी स्थानकांचे बांधकाम वेगाने सुरू आहे. त्यामुळे लवकरच मेट्रो सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ‘फेज २ए’ च्या बांधकामासोबतच त्याची रचना आणि पद्धतशीर कार्ये देखील अंतिम केली जात आहेत. सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर हा टप्पा वाहतूक सेवेत आणण्यासाठी आवश्यक असलेली अंतिम मंजुरी मिळेल. या टप्प्याचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुंबईच्या वाहतूक कोंडीला दिलासा मिळू शकेल.
मुंबई मेट्रो मार्गाची म्हणजे एका लाइनची एकूण लांबी ३३.५ किलोमीटर आहे. या मार्गावर एकूण २७ स्थानके आहेत. हे कॅफे परेड बीकेसी आणि आरे जेव्हीएलआरला जोडते. १२.६९ किमी लांबीच्या या विभागाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२४ मध्ये फेज-१ मध्ये केले होते. या मार्गाचा आणखी एक भाग मार्चमध्ये सुरू होणार आहे. हा रस्ता बीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंत आहे. आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो गेल्याने बीकेसी ते वरळी दरम्यान मेट्रोची जोडणी होणार आहे.