ठाणे : हिवाळ्यात आल्हादायक वातावरण असेल असे भाकीत करण्यात आले होते.मात्र,ऐन थंडीत उष्म्याच्या चटका जाणवू लागला आहे. गेल्याच पाच सहा दिवसांपासून ठाणे शहरातला तापमानाचा पारा वाढला असून,मंगळवरी उष्म्याचा पारा कमाल ३७.०२ अंशावर पोहोचला आहे. येत्या काही दिवसामध्ये हा पारा खाली येईल,असे भाकीत हवामान वेधशाळा करतअसली तरी यंदाचा उन्हाळा ठाणेकरांसाठी तापदायक ठरणार असल्याची जणू चाहूल निसर्गाने दिली आहे. होळीला अजून तब्बल एक महिन्याचा कालावधी असताना,या अगोदरच उन्हाच्या झळा ठाणेकरांना सोसाव्या लागत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसाप्रमाणे दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे ठाणेकरांसाठी त्रासदायक बनले आहे.
एरवी कमाल २६ ते ३० डिग्री सेल्सियस तापमान असणा-या ठाणे शहरात आता कमाल तापमान तब्बल ३६ ते ३७ अंश डिग्री सेल्सियसपर्यंत झेपावल्यामुळे उन्हाळ्याचा फील ऐन हिवाळयात जाणवू लागला आहे. मंगळवारी किमान तापमान अंश सेल्सियस तर कमाल तापमान सेलसियस नोंदवले गेले असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापक कक्षाकडून मिळाली आहे.गेल्या पाच सहा दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत आहे.मात्र,वाढणारे तापमान हे क्षणिक आहे. येणाऱ्या पुढच्या काही दिवसात तापमानाचा पारा खाली येऊन चांगली थंडी पडेल,असे संकेत वेधशाळेने दिले आहेत.
पहाटे गुलाबी थंडीचा अनुभव ठाणेकर घेत असताना,दुसरीकडे दुपारी कडाक्याच्या उष्मा वाढला आहे.ग्लोबल वार्मिंगमुळे पृथ्वीचे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या उन्हाचा कोणाला त्रास होत असेल तर शक्यतो बाहेर न पडण्याच्या सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो. उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन चक्कर येणे,श्वसन विकाराचा त्रास बळावण्याचा संभव असतो.या उन्हात सुर्यकिरणांचा आघात थेट डोळ्यांमधील नेत्रजलावर होतो. त्यामुळे काहीवेळा डोळ्यासमोर अंधारी येणे,भिरभिरणे असे
प्रकार होतात.