Sunday, July 6, 2025

रेशनकार्ड-आधार प्रमाणीकरणाकडे लाभार्थ्यांनी फिरवली पाठ

रेशनकार्ड-आधार प्रमाणीकरणाकडे लाभार्थ्यांनी फिरवली पाठ
अलिबाग (प्रतिनिधी) : रेशनकार्ड-आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी पुरवठा विभागाने रायगड जिल्ह्यात विशेष शिबिरे आयोजित केली होती; परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसून, आतापर्यंत केवळ ६० टक्के लोकांचेच आधार प्रमाणीकरण झाले आहे. त्यामुळे या कामासाठीची मुदत शनिवारी संपल्यानंतरही हे काम पुढे सुरू ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत, त्यानुसार रेशनकार्डला आधार प्रमाणीकरण बंधनकारक केले आहे. आधार प्रमाणीकरण नसल्यास रास्तभाव धान्य दुकानातून रेशन न देण्याचे निर्देश पुरवठा विभागाने दुकानदारांना दिले होते. यासाठी १५ फेब्रुवारी ही अंतिम तारीख देण्यात आली होती; परंतु हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ऑनलाईन होणाऱ्या या प्रक्रियेत इंटरनेटचा सावळागोंधळ निर्माण होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दहा लाखांहून अधिक नागरिकांची केवायसी केल्याची माहिती जिल्हापुरवठा अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

सदोष इंटरनेटचा अडसर

शिधापत्रिकेत असलेल्या लाभार्थ्यांची माहिती शासनाकडे राहावी यासाठी पुरवठा विभागाने धान्य वाटप पारदर्शक करण्यावर भर दिला आहे. त्याची अंमलबजावणीदेखील जिल्ह्यातील दुकानांमध्ये सुरू आहे. ई-पॉस मशीनवर अंगठ्याचा ठसा देऊन ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू आहे; परंतु अनेक गावांतील रास्तभाव दुकानांमध्ये इंटरनेटचा सावळागोंधळ निर्माण झाल्याने ई-केवायसी करताना तासंतास दुकानासमोर उभे राहण्याची वेळ येत आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >