पालघर (वार्ताहर) : मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या एकूण १०६९ जागा कंत्राटी पद्धतीने मानधनावर शैक्षणिक व व्यावसायिक पात्रताधारण करणाऱ्या शिक्षकांची भरती करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पालघर जिल्हा परिषदेला दिले आहेत. मात्र पेसा अंतर्गत असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची भरती करताना स्थानिक पात्रताधारक बिगर आदिवासी उमेदवारांची भरती करावी अशी मागणी बिगर आदिवासी संघटनेच्या पात्रता धारक शिक्षकांनी केली आहे.
पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २ हजार ३७१ प्राथमिक शाळा आहेत. जिल्हा परिषद शाळा मधील शिक्षकांची एकूण ७१०८ पदे मंजूर आहेत. त्यातील ५२१७ पदे सध्या भरलेली आहेत. पेसा क्षेत्रातील १८९१ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. पदे रिक्त असल्यामुळे अनेक शाळांमध्ये फक्त एका शिक्षकावर सर्व इयत्तेतील विद्यार्थ्यांना शिकविण्याची वेळ आली आहे
काही शाळांमध्ये शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जिल्ह्यातील काही शिक्षक संघटनामार्फत आंदोलने करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणामुळे पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे कायमस्वरूपी नियमित स्वरूपात भरण्यास स्थगिती आहे. मात्र शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता खासदार डॉ हेमंत सावरा व जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषद प्रशासनाने शालेय शिक्षण विभागाकडे ही रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी नियमित पाठपुरावा केला होता.
त्यानुसार पहिल्यावेळी पेसा अंतर्गत शाळांमध्ये आदिवासी पात्रता धारक ८२२ शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती केलेली आहे तरी उर्वरित १०६९ शिक्षकांची रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने त्वरित भरण्याचे आदेश शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेला दिले आहेत. त्यानुसार पात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाल्यानंतर पालघर जिल्ह्यात पेस क्षेत्रातील १०६९ शिक्षकांची भरती होणार आहे. सर्वप्रथम दुर्गम भागातील शून्य शिक्षकी शाळा त्यानंतर एक शिक्षकी व कमी शिक्षक असलेल्या शाळा असे प्राधान्यानुसार शिक्षक भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या जागी स्थानिक पात्रता धारक शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न सुटण्यास मदत
होणार आहे.