घरात आमच्या,
टीव्ही आला.
साऱ्यांनी एकच,
गलका केला.
दादा म्हणतो,
कार्टुन लावा.
ताईला हवा,
सिनेमा नवा.
गाणी जुनी,
बाबांना हवी.
आईची आपली,
मालिका नवी.
आजीची तर,
तऱ्हाच न्यारी.
‘दूरदर्शन’ लावी,
भल्या प्रहरी.
आजोबांना टीव्हीवरील,
बातम्यांचा छंद.
टीव्हीमुळे बोलणारे,
घर झाले बंद.
काव्यकोडी – एकनाथ आव्हाड
१) हिंगोली जिल्ह्यातील
कडोळी गावी जन्मलेले
चित्रकूट हे त्यांचे
कर्मस्थान झाले
दीनदयाळ संशोधन संस्था
स्थापन त्यांनी केली
विनोबा भावेंच्या भुदान चळवळीशी
नाळ कोणी जोडली?
२) थोर संगीतकार म्हणून
ते नावारूपास आले
भारतरत्न पुरस्काराने
सन्मानितही झाले
प्रख्यात शहनाई वादक
जगात नाव ज्यांचे
कोण सांगेल मला की
नाव काय त्यांचे?
३) पाथेर पांचाली सिनेमा
त्यांनी तयार केला
गुप्तहेर फेलूया त्यांच्या
साहित्यातून कळून आला
संगीत, पटकथा, दिग्दर्शन
सारेच त्यांनी केले
ऑस्कर पुरस्काराने
कोणास गौरविण्यात आले?
उत्तर –
१) नानाजी देशमुख
२) बिस्मिल्ला खान
३) सत्यजित रे