अॅड. रिया करंजकर
हराकडे लोक नोकरी-धंदा करण्यासाठी येतात. शहरांमध्ये भाड्याने घर घेऊन राहतात. काही लोकही चाळीसारख्या घरांमध्ये राहतात, तर काही चांगल्या सोसायटीमध्ये रूम भाड्याने घेऊन राहतात. यासाठी रूम मालक आणि भाडोत्री यांच्यामध्ये ११ महिन्यांचे अॅग्रीमेंट बनवले जाते. त्यासाठी डिपॉझिट आणि महिन्याला एक ठरावीक रक्कम मालकाला दिली जाते. भाडोत्रीला घर खाली करायच्या वेळी डिपॉझिट रक्कम परत मिळते.
रामदास यांचा चांगल्या सोसायटीमध्ये टू बीएचके फ्लॅट होता. तो त्यांना भाड्याने द्यायचा होता. त्यासाठी त्यांनी भाडोत्री दलालाच्या मार्फत शोधला होता. रामदास यांनी आपल्या बायकोच्या म्हणजेच सीमाच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी बनवली होती. कारण हे दांपत्य जरा वयस्कर होते. मालक आणि भाडोत्री यांच्यामध्ये भाडेकरार बनलेला होता ते सीमा यांच्या नावाने बनलेला होता. सिद्धार्थ हा भाडोत्री होता आणि सीमा यांच्यामध्ये हे अॅग्रीमेंट ११ महिन्यांचे तयार केले होते. डिपॉझिट दिल्यानंतर सिद्धार्थ याने वर्षभर दर महिन्याचे भाडं दिलं नाही. त्यामुळे रामदास यांनी त्यांना रूम खाली करायला सांगितली. त्यावेळी सिद्धार्थ यांनी विनवणी करूनही अजून एक वर्ष राहायला द्या आम्ही पुढच्या वेळेचे भाडं व्यवस्थित देऊ असे सांगितले. रामदासने अजून एक वर्ष त्यांना वाढवून दिले. पुन्हा सिद्धार्थने तोच प्रकार केला. दर महिन्याला भाडं देणं बंद केले. म्हणून रामदासने त्याला घर खाली करायला सांगितले. त्यावेळी मात्र सिद्धार्थने रामदासला सांगितलं की, तुम्ही आम्हाला हा रूम विकलेला आहे. त्यामुळे या घराचे मालक आम्हीच आहोत. मालक आम्ही असल्यामुळे तुम्ही आमच्याकडून भाडं कुठल्या कारणाने मागता. म्हणून रामदास आणि सीमा हे दोघीही पोलीस स्टेशनला जाऊन सिद्धार्थच्या विरुद्ध तक्रार केली. त्यावेळी पोलिसांनी सिद्धार्थला पोलीस स्टेशनला बोलवले. सिद्धार्थने रूमचे सर्व पुरावे दाखविले. त्यावेळी रामदास म्हणाला, घराचा मालक मी आहे. माझ्या परवानगी न घेता घर विकलचं कसं गेलं. त्यावेळी सिद्धार्थने घराचे पॉवर ऑफ अॅटर्नी मी तुमच्या पत्नीला दिले असल्यामुळे तुमच्या पत्नीने ते घर आम्हाला विकलेले आहे. खुद्द सीमालाही आपण घर विकले आहे हेच माहीत नव्हतं. सिद्धार्थने त्या पेपरवर असणाऱ्या सीमाच्या सह्या दाखविल्या. चांगल्या सोसायटीतला रूम फक्त दहा लाखाला कसा काय विकला गेला हा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. शेवटी हे प्रकरण पोलिसांनी कोर्टात घेऊन जाण्यासाठी सांगितले.
रामदास यांची फसवणूक नेमकी कोणी केली आहे. सिद्धार्थने की त्यांची पत्नी सीमाने केली आहे याचा उलगडा आता न्यायालयातच होऊ शकतो. म्हणून रामदास यांनी न्यायालयाची धाव घेतली आहे. आपले घर, आपली प्रॉपर्टी, जेव्हा भाड्याने देतो त्यावेळी ती काळजीपूर्वक पेपरवर्क करून दिली गेली पाहिजे. आपण कुठे सह्या करतो, कुठे नाही याचं भान ठेवलं पाहिजे. नाही तर आपण कष्टाने कमावलेली आपली मालमत्ता हातातून निष्टून कधी जाईल हे सांगता येणार नाही.
(सत्यघटनेवर आधारित)