Sunday, June 22, 2025

Salav Bridge Alibaug : साळाव पुलाच्या कामामुळे कांदळवन धोक्यात

Salav Bridge Alibaug : साळाव पुलाच्या कामामुळे कांदळवन धोक्यात

अलिबाग : अनेक जलचर प्राणी, खेकडे, मासे, झिंगा या जीवांचे आश्रयस्थान असणारे रेवदंडा परिसरातील कांदळवन आता अलिबाग–मुरुड तालुक्यांना जोडणाऱ्या साळाव पुलाच्या कामामुळे सुमारे कांदळवन धोक्यात आले आहे. प्रस्तावित रेवस-रेड्डी प्रकल्पासाठी उभारण्यात येणार्या पुलाच्या कामासाठी कांदळवनाचे सुमारे अडीच हेक्टर क्षेत्र नेस्तनाबूत होणार असून, त्यामुळे समुद्रातील जीवांबरोबरच मासेमारीचा व्यवसायही धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात असून, मच्छीमारांचे कायमस्वरुपी रोजगाराचे साधन बंद होणार असल्याचे मच्छिमारांकडून सांगण्यात आले. सध्या औद्योगिकरण वाढत असून, पर्यटनामुळे कोकणातील वर्दळही प्रचंड वाढली आहे. रायगडसह कोकणात पर्यटनासाठी जाताना वेळेवर पोहचता यावे, यासाठी रेवस ते रेड्डी हा सागरी महामार्ग विकसित केला जाणार आहे. अलिबाग तालुक्यातील रेवस ते सिंधूदुर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंत असणारा हा रस्ता ४९८ किलोमीटरचा आहे.



या महामार्गाला रायगडसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे जोडले जाणार आहेत. या महामार्गामध्ये वेगवेगळ्या नवीन पुलांची उभारणी केली जाणार आहे. त्यामध्ये रेवदंडा येथील साळाव हा पूल असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत त्याचे काम केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रेवदंडा-साळाव नवीन पूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे रेवदंडा बंदरालगत असलेले कांदळवनाचे सुमारे अडीच हेक्टर क्षेत्र नष्ट होण्याची शक्यता आहे. त्या कांदळवनात लाल झेंडे लावण्यापासून पुलासाठी कांदळवनाची जमीन किती घ्यायची याचे मोजमाप गेल्या काही दिवसांपासून सुरु झाले आहे. या पुलामुळे कांदळवनात आश्रय घेणारे खेकडे, झिंगा व इतर जलचर प्राणी नष्ट होण्याची भिती आहे. तसेच मच्छीमारांवरही मोठे संकट उभे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी यामुळे मच्छीमारांचा रोजगार जाणार असल्याचे तेथील मच्छीमारांकडून सांगण्यात आले आहे.


अलिबाग तालुक्यातील रेवदंडा-साळाव पूल जुना झाल्याने त्याची अनेकदा डागडुजीसुद्धा करण्यात आली आहे. दरम्यान, या पुलाला पर्यायी म्हणून नवीन पुलाची उभारणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात कांदळवनाची कत्तल करण्यात येणार आहे. जुन्या पुलाच्या बाजुलाच नवीन पूल बांधण्यात येत आहे; परंतू साळाव पुलापासून जवळपास तीनशे मीटर आत जेट्टीच्या बाजुला हा पूल उभारला जाणार आहे. त्यामुळे रेवदंडा बायपासच्या बाजुचे कांदळवन यामुळे नष्ट होणार आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणावर चालविली जाणारी कुर्हाड स्थानिकांसह पर्यावरणप्रेमींना मान्य नसून, त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment