नाशिक : दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहराची सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्थेसंबंधी निर्णय घेण्यात येणार असून याच पार्श्ववभूमीवर पुढील चार दिवस रात्री अकरा नंतर शिर्डी पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. वाढती गुन्हेगारी लक्षात घेता त्यावर उपाययोजना आखण्यात येणार आहेत.
Mumbai News : नागपूर-सिकंदराबाद-वंदे भारत एक्स्प्रेस आता आठ डब्यांसह चालणार
मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीत गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांनंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईवर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे एक स्थायी पथक शिर्डीत नियुक्त करण्यात आले आहे. आठ जणांचे हे पथक येथील गुन्हेगार आणि त्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवून राहणार आहे. तसेच शिर्डीत राहणाऱ्यांचे आधार, रेशनकार्ड यांची चौकशी नगरपालिकेकडून करून घेण्यात येणार आहे. यात काही चुकीचे आढळून आले तर संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. शिर्डी शहरात पोलिसांच्या रेकॉर्डवर लहानमोठे ११४ तर १२ सराईत गुन्हेगार आहेत. यातील १३ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे; तर १३ जणांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. अन्य जिल्ह्यांतून तडीपार केल्या जाणाऱ्या गुन्हेगारांना यापुढे शिर्डीत आश्रय देऊ नये, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
डॉ. विखे काय म्हणाले ?
डॉ. विखे म्हणाले ‘रात्री अकरा वाजता साईबाबांची आरती संपल्यानंतर शिर्डी पूर्णपणे बंद राहणार असल्याची सूचना पुढील चार दिवस गावात दवंडी देऊन दिली जाईल. त्यानंतर या निर्णयाची कडक अंमलबजावणी केली जाईल. रात्री साडेअकरा वाजता सर्व हॉटेल बंद करण्याचा निर्णय ग्रामसभेत झाला आहे. शिर्डीत राहणाऱ्यांचे आधार, रेशनकार्ड यांची चौकशी नगरपालिकेकडून करून घेण्यात येणार आहे. यात काही चुकीचे आढळून आले तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. साईप्रसादालयातील भोजनावरून आपल्यावर टीका झाली. मात्र, यासंबंधी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे चांगले परिणाम दिसून येऊ लागले आहेत. त्यामुळे शिर्डी बाहेरच्या लोकांची टीका आणि सल्लेही ऐकून घेतले जाणार नाहीत. येथील ग्रामस्थांच्या पुढाकारातून आणि गरजेनुसार निर्णय घेतले जातील,’ असेही विखे म्हणाले.