मुदतठेवींमधून अंतर्गत कर्ज आणि थेट खर्चापोटी दाखवला ३० हजार कोटींचा निधी
मुंबई(सचिन धानजी) : महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी सन २०२५-२६ या वर्षांसाठी ७४, ४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला; परंतु या अर्थसंकल्पाचा आकडा अंतर्गत कर्ज आणि राखीव निधीतील वापरण्यात येणारा पैसे यावर वाढवण्यात आला आहे; परंतु राखीव आणि बांधिल दायित्वापोटी असलेल्या ४१ हजार कोटी रुपयांपैकी १६ हजार कोटी रुपये म्हणून वळते करण्यात येणार आहे. हा पैसा कंत्राटदाराच्या अनामत रकमेच्या जमा पैशातून वळवता करण्यात येत असून १३ हजार कोटी रुपये हे पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी असलेल्या ३९ हजार कोटीमधून थेट खर्च केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई महापालिकेने आगामी अर्थसंकल्पात तात्पुरते अंतर्गत हस्तांतरण अंतर्गत १६,६९९.७८ कोटी रुपये आणि राखीव निधी तथा राखीव निधीतून १३, ६५८.०१ टक्के अशाप्रकारे तब्बल ३० हजार कोटी रुपयांच्या जोरावर महापालिका अर्थसंकल्पाचा आकडा वाढवला गेला. मुंबई महापालिकेने मुदतठेवी अंतर्गत तब्बल ८२ हजार कोटींची रक्कम दर्शवली आहे. त्यात विविध पायाभूत विकास प्रकल्पांसाठी २९ हजार कोटी रुपये हे खर्च केले जावू शकतात, तर सुमारे ४२ हजार कोटींहून अधिक रक्कम ही बांधिल दायित्वापोटी आहेत, ज्यातील रक्कम महापालिका थेट काढू शकत नाही. मात्र, पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी असलेल्या ३९,५४३.६४ कोटी रुपयांपैकी १२,६५८ कोटी रुपये थेट काढून खर्च केले जाणार आहे. त्यामुळे पुढील वर्षांत मुदत ठेवीतील पायाभूत सुविधांसाठी असलेल्या रकमेचा आकडा घटून २६ हजार कोटींवर येण्याची शक्यता आहे, तर बांधिल दायित्वापोटी राखीव निधी अंतर्गत असलेल्या ४२,२३० कोटी रुपयांपैकी १६, ६९९ कोटी रुपयांची अंतर्गत कर्ज अंतर्गत हस्तांतरण दर्शवले आहे. विशेष म्हणजे राखीव निधीमधून जी १६, ६९९ कोटी रुपयांची रक्कम उचल दाखवली आहे, ती रक्कम कंत्राटदारांच्या आणि इतर पक्षकारांच्या ठेव रकमेपोटी असलेल्या २१,८५५.१५ कोटी रुपयांमधून वळती केली जाणार आहे.
मुंबईतील २१ टक्के लोक मलवाहिन्यांच्या सेवा-सुविधांपासून वंचित
अनामत रकमेवरील व्याजातून पालिकेला पैसा प्राप्ती
कंत्राटदारांकडून विविध विकासकामांसाठी एकूण कंत्राट रकमेपेटी अनामत रक्कम महापालिकेत जमा केली जाते, व ही रक्कम कंत्राट काम पूर्ण झाल्यानंतर तसेच हमी कालावधी संपल्यानंतर कंत्राटदारांना अनामत रक्कम परत केली जाते. त्यामुळे कंत्राटदारांची अनामत रक्कम ही महापालिकेकडे किमान पाच ते दहा वर्षांपर्यंत असते अणि या अनामत रकमेवर पालिकेला व्याजाच्या माध्यमातून पैसा प्राप्त होतो. सध्या बांधिल दायित्वापोटी राखीव निधीमध्ये कंत्राटदारांकडून अनामत रकमेपोटी जमा असलेल्या २१,८५५ कोटीमधून अंतर्गत कर्ज म्हणून वळते केले जाणार आहे. त्यामुळे ही रक्कम खर्च झाल्यास कंत्राटदारांच्या अनामत रकमेपोटी सहा हजार कोटी रुपयांची रक्कम शिल्लक राहणार असून पालिकेने ही रक्कम तात्पुरत्या स्वरुपात दर्शवली असल्याने प्रत्यक्षात ही रक्कम खर्च झाल्यास आणि महसूल प्राप्त न झाल्यास कंत्राटदाराच्या अनामत रकमेतून मिळणाऱ्या रक्कमेत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.