रत्नागिरी : उद्धव ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजन साळवींनी राजीनामा दिला. ते लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. बाळासाहेबांच्या विचारांनी चालणाऱ्या शिवसेनेचा भगवा हाती घेण्याची तयारी राजन साळवींनी केल्याचे सूत्रांकडून समजते.
मागील अनेक दिवसांपासून राजन साळवी उद्धव ठाकरेंच्या गटातून बाहेर पडणार असल्याची चर्चा होती. आता राजन साळवींनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजन आणि त्यांचे समर्थक उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याचे निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राजन साळवी हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघातून २००९ ते २०२४ या काळात आमदार होते. शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या किरण सामंत यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवींचा पराभव केला. याआधी राजन साळवी २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग तीन वेळा विधानसभा निवडणुकीत राजापूरमधून विजयी झाले होते. आमदार असताना राजन साळवींनी महाविकास आघाडीकडून २०२२ मध्ये विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत महायुतीच्या राहुल नार्वेकरांचा विजय झाला आणि साळवी पराभूत झाले होते.
Political Breaking News : शरद पवारांनी केले एकनाथ शिंदेंचं तोंडभरून कौतुक!
राजन साळवींची कोकणातील लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात ताकद आहे. यामुळे राजन साळवींनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची कोकणातील ताकद वाढण्यास मदत होईल. उद्धव ठाकरे गटाची राजकीय ताकद आणखी कमी होईल; अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंनी कोकणात विनायक राऊत यांना जास्त महत्त्व दिले. यावरुन राजन साळवी आणि विनायक राऊत यांच्यात मतभेद झाले. या मतभेदांमुळेच राजन साळवींनी उद्धव यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.