मुंबई : राज्यातील संशयीत संस्था व मदरसे यांची कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने एस.आय.टी. स्थापन करण्यात येवून उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नितेश राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, जामिया इस्लामिया इशातुल उलूम इन्स्टिट्यूट अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार यांचे अध्यक्ष व संस्थापक व इतर स्टाफ यांनी कोणत्याही प्रकारचा वैध व्हिजा नसताना आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, बँक खाते अशा प्रकारचे महत्वाचे दस्तऐवज बनवून बेकायदेशीररित्या यमन नागरिकास वास्तव्यास ठेवून इतर सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या व यमन देशातील कुटुंबीय आणि इतरां विरोधात बीएनएस, परदेशी कायदा आण दि टेलिग्राफ कायद्याच्या संबंधित कलमांखाली दिनांक ११.०२.२०२५ रोजी गु.र.नं.३०/२०२५ अन्वये अक्कलकुआ पोलीस ठाणे, जि. नंदुरबार येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात सुरु असलेल्या सदरील संस्था व मदरश्यांमधून राष्ट्र विरोधी शिक्षण दिले जाणे, विशिष्ट धर्माच्या नागरिकांना बेकायदेशीररित्या आश्रय दिला जाणे, देश विरोधी कारवायांकरीता आर्थिक मदत पुरविली जाते. अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या संशयीत संस्थांचा शोध घेण्यात येवून त्याच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी करण्याची मागणी विविध स्तरावरुन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. संशयीत संस्था व सदरील मदरसे यांचेवर कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने एस.आय.टी. स्थापन करण्यात येवून उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत संबंधितांना आदेशित व्हावे,अशी मागणी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.