दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणी काल पार पडली आणि यात अपेक्षेप्रमाणे आप पक्षाचा म्हणजे आम आदमी पक्षाचा सुपडा साफ झाला. २७ वर्षांनंतर भाजपाचे सत्तेत पुनरागमन झाले आहे. याचे श्रेय अनेक घटकांना देता येईल. नरेंद्र मोदी यांचा करिश्मा, त्यांची मतदारांवर अजूनही असलेली जादू आणि आम आदमी पक्षाची नकारात्मक मनोभूमिका यांचा वाटा त्यांच्या दारुण पराभवात मोठा आहे. यापूर्वी भाजपाने १९९३ मध्ये दिल्लीत सत्ता हस्तगत केली होती. त्यानंतर आता इतक्या वर्षांनंतर भाजपा ४७ जागा जिंकून पुन्हा सत्तेत आला आहे. दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी ७० जागांसाठी मतदान पार पडले होते. विरोधीपक्षांनी कितीही ओरड केली तरीही मतदात्यांनी भाजपाला असलेली साथ सोडली नाही आणि आपदापासून स्वतःला मुक्त केले. आम आदमी पार्टीचे बहुतेक सारे दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. त्यात अरविंद केजरीवाल यांचाही समावेश आहे.
दिल्ल्लीत सलग दहा वर्षे सत्ता भोगल्यानंतरही आम आदमी पक्षाला यंदा पराभवाचा फटका बसला आहे. त्याची कारणे अनेक आहेत पण त्यापैकी प्रमुख आहे ते म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पार्टीवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. त्यासाठी केजरीवाल तुरुंगात जाऊनही आले. ते आरोप जनतेच्या मनातून धुऊन कधीच निघाले नाहीत. केजरीवाल यांची प्रतिमा भ्रष्टाचारविरोधी नेता अशी होती. पण त्याच पक्षाचे विशेषतः मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा सर्वाधिक भ्रष्ट नेते अशी झाली. त्याचा फटका आम आदमी पक्षाला बसला आहे. यमुना नदीची स्वच्छता, पॅरिसच्या दर्जाचे रस्ते अशी आश्वासने केजरीवाल यांनी दिली होती. ती त्यांना पाळता आली नाहीत हेही कारण त्यांच्या निवडणुकीतील अपयशामागचे आहे.
आम आदमी पार्टीचे नेते केजरीवाल यांना गतवर्षी झालेली अटक आणि नंतर त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे पक्षाचे नेतृत्व अस्थिर झाले. याचाही फटका पक्षाला निवडणुकीत बसला आहे. भाजपा आणि आप पक्षात फक्त तीन टक्क्यांचा फरक आहे. पण या पराभवाला कारण मध्यमवर्गीयांनी काँग्रेसला दिलेला दणका आहे असे मत काही विश्लेषकांनी मांडले आहे. आम आदमी पार्टीने मध्यमवर्गीयांना गमावले आहे, तर भाजपाने तो मतदार आपल्याकडे पुन्हा कमावला आहे असे काही विश्लेषकांचे मत आहे. कारण इतकी वर्षे केजरीवाल यांनी लोकांसाठी फ्री वॉटर, मोहल्ला क्लिनीक अशी तरतूद केली होती. पण यंदा ती लोकांना भावू शकली नाही. आपने शीश महल आणि मद्य घोटाळा या दोन प्रकरणांमुळेही मतदारांना गमावले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामुळे मध्यमवर्गीय मतदार पुन्हा भाजपाकडे वळला असे सांगितले जाते. या वर्गाकडे भाजपाने दुर्लक्ष केले होते. पण आता पुन्हा भाजपाला त्याचे महत्त्व कळले आहे. त्यामुळे या वर्गाशिवाय आपला तरणोपाय नाही हे भाजपाला कळले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न असलेल्यांना करमुक्त केल्याचा जोरदार फायदा भाजपाला झाल्याचे बोलले जात आहे. त्यात केजरीवाल यांनी दिल्लीतील बस प्रवासात महिलांना दिलेल्या सवलती आणि इतर अनेक लाभांचे परिणाम फारच फिके ठरले.
अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्या पराभवाबद्दल भाष्य केले आहे. ते म्हणाले की, उमेदवारांमध्ये आचरण विचार, शुद्ध असणे आणि जीवन निष्कलंक असणे हे गुण मतदारांना भावतात. या आघाडीवर बहुतेक उमेदवारांचे जीवन तपासले असता तसे ते नाही असे लक्षात येते. मतदारांना विश्वास वाटायला हवा, तसा तो केजरीवाल यांनी कधीचाच गमावला होता. त्याचा फटका त्यांना यंदा बसला. दारू आणि संपत्ती यात त्यांचे मुद्दे वाहून गेले. दारूचे दुकान काढून त्याला परमीट द्यायचे हे विचार त्यांच्या मनात शिरले तेव्हाच त्यांचे पतन निश्चित होते. आता भाजपाचे सरकार येणार हे निश्चित झाल्यावर आता भाजपाचे मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात दुष्यंत कुमार आणि परवेश वर्मा हे आघाडीवर आहेत. पण आपचा पराभव का झाला याचे विश्लेषण केले असता ही एक बाब प्रकर्षाने समोर येते ती म्हणजे जनतेला आपल्या पायाखालचे साधन समजण्याची आपची प्रवृत्ती त्यांना नडली आहे. शीश महल या केजरीवाल यांच्या निवासस्थानासाठी ४५ कोटी रुपये खर्च करण्याची काहीही गरज नसताना त्यांनी केलेली खेळी अंगाशी आली आहे.
दिल्लीचे बहुंसंख्य लोक झुग्गीझोपड्यांमध्ये राहत असताना केजरीवाल यांनी आपल्या सरकारी निवासस्थानासाठी इतका मोठा खर्च करण्याची केलेली खेळी त्यांच्या अंगलट आली आहे. १२ वर्षांनंतर आप सत्तेबाहेर झाली आहे. त्यात केजरीवाल यांच्यासह दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. केजरीवाल हे जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा दिल्लीची सत्ता सांभाळणारे मनीष सिसोदिया हेही आता पराभूत झाले आहेत. हा झटका मोठा आहे. तरविंदर सिंह मारवाह यांनी त्यांचा पराभव केला आहे. ते त्या अर्थाने जायंट किलर ठरले आहेत. त्यांच्यासोबत अरविंद केजरीवाल, आणि सत्येंद्र जैन यांचाही पराभव झाला आहे. याचा अर्थ लोकांना एकच वेळ फसवता येते. पण वारंवार फसवता येत नाही. केजरीवाल यांनी आप पक्षाच्या माध्यमातून लोकांना वारंवार फसवले आणि त्यांचा या निवडणुकीत सफाया झाला आहे. काँग्रेसचा तर पुरता बोऱ्या वाजला आहे. काँग्रेसची एकही जागा आली नाही. काँग्रेस जी एकेकाळी संपूर्ण देशभरात सत्तेवर होती आणि सत्ता गाजवत होती तिचे आता नामोनिशाण राहिले नाही. काँग्रेसच्या ताब्यातून आणखी एक राज्य गेले आहे आणि भाजपाच्या किटीत ते सामील झाले आहे. अत्यंत सूज्ञ असा हा निकाल आहे आणि तो लोकांनी आपसारख्या पक्षांना तडीपार करून लोकांना एक चांगली शिकवण दिली आहे ती म्हणजे लोकांशी प्रामाणिक राहिले तरच तो तरतो. काँग्रेस आणि आपच्या पराभवाचा हाच मतितार्थ आहे.