Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिककोलाजमनात प्रेमाचा जिवंत झरा जपण्यासाठी...

मनात प्रेमाचा जिवंत झरा जपण्यासाठी…

रसिका मेंगळे

भारतीय संस्कृती पाश्चात देशात महान मानली जाते. मात्र भारतीय संस्कृतीने आपल्याला सण, समारंभ उत्सवाचे भरपूर भांडार उपलब्ध करून दिलेत. दरवर्षी येणारा फेब्रुवारी महिना प्रेमाचा महिना मानला जातो.आणि या फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर येणारा हा व्हॅलेंटाइन डे म्हणजे कितीतरी जणांसाठी अगदी महत्त्वाचा दिवस असतो. अनेक प्रेमी-प्रेमिका या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. व्हॅलेंटाईन वीक सुरू झालंय. खरे तर व्हॅलेंटाईन वगैरे आम्हा भारतीयांची संस्कृती नाहीच. पण या वेस्टर्न लोकांचे कौतुक करायला हवे… प्रेम व्यक्त करण्यासाठी निरनिराळे दिवस शोधून काढतात. खरे तर प्रेम ही एक पवित्र भावना आहे ती जपावी. प्रेम घ्यावे तितक्याच आपुलकीने द्यावे सुद्धा. प्रेम कोणावरही करा प्रेमासारखी सुंदर गोष्ट जगात कुठलीच नाही. म्हणून काय बेधुंद, बिनधास्त, बेधडकपणे सार्वजनिक ठिकाणी कोणतेही भान न बाळगता प्रदर्शित करू नये. प्रेम वासनेच्या आहारी जाऊन त्याचे अत्यंत कृरता, हिंसकता काही वेळेस दिसते हे प्रेम नव्हेच. प्रेमासाठी वाटेल ते म्हणणारे आपल्याच जीवाशी खेळून जातात. यातून प्रेम करणे दूरच राहते पण त्याचा अंत मात्र घातपातावर संपतो.

सध्याच्या युगात प्रेमाच्या व्याख्या बदललेल्या असून ऑनलाईन, तर कधी ऑफलाइन प्रेम जुळताना पाहायला मिळते. काळानुरूप प्रेमाची भाषा बदलली. फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा वसंत फुलविणारा महिना. प्रेमाचा संदर्भ प्रथम तरुण-तरुणी मधल्या हळुवार नात्याशी जोडला जातो. मात्र प्रेमाचा हा केवळ हलकासा पदर आहे हे आपण विसरतो. खरे तर व्हॅलेंटाईन डे केवळ तरुणाईंचा नसून मनात प्रेमाचा जिवंत झरा जगणाऱ्या जपणाऱ्या प्रत्येकाचा असतो. प्रेम जगणं शिकवते, प्रेम जपणं शिकवते, प्रेम प्रेमात हरणं शिकवते, प्रेमच शिकवते प्रेमाची बदलती जाणीव. अनुभवाची, परिणामाची साठवणूक करणारं मन अधिकाधिक समृद्ध होत जाते. प्रेमाची अदृश्य शक्ती हीच प्रत्येकाच्या जगण्याची प्रेरणा होते आणि ऐलतीरापासून सुरू होणारा प्रवास पैलतीरी पोहोचेपर्यंत साथ देते. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेमाचे नाना विविध कंगोरे समोर येतात. त्याचं दर्शन वयाच्या प्रत्येक वळणावर जाणिवांचा मोहोर फुलवतो. आणि जगण्याचा ताटवा बहुरंगाने सजत राहतो.

वर्षाचे ३६५ दिवस रोजच्या जीवनातून, जगण्यातून आणि प्रिय व्यक्तिप्रती प्रेम व्यक्त करू शकतो. त्यासाठी कोणा एका दिवसाची गरज नसते. खरे तर आपण करीत असलेले प्रत्येक काम म्हणजे प्रेम. ते काम मन लावून प्रेमाने करणे म्हणजे प्रेम. फुल देऊन साजरी करणे म्हणजे प्रेम नव्हे. मला सांगा मंडळी व्हॅलेंटाईन डे ची गरज आहे का? प्रेमभावना एकजीव होत जाऊन एका ठराविक दिवसांपूर्वी मर्यादित नक्कीच नाही आणि खरे प्रेम व्यक्त करायला अशा एका नियोजित दिवसाची गरजही नाही कारण प्रेम हा व्यापाराचा खेळ नसून उत्कट भावनांचा मेळ असतो. हृदयाच्या आकाराचे रंगीत फुगे किंवा सोन्या हिऱ्यात मढवलेले लॉकेट भेट देऊन प्रेम व्यक्त करावे लागण्याएवढी प्रेमभावना स्वार्थी नक्कीच नसावी. गुलाबाचे फूल असेलही कदाचित प्रेमाचे प्रतीक पण म्हणून प्रेमासाठी काटे टोचून घेतलेल्यांचा कल असूच नये मुळी. प्रेमभावना असावी सोनचाफ्याच्या फुलासारखी घेणाऱ्याला सुगंध देणारी आणि देणाऱ्याच्या हातातही परिमळ दरवळत ठेवणारी. सुकल्यावरही सुगंध बहरवणारी. बहरणं आणि फुलणं हा फुलाचा स्वभाव आहे. प्रेमात गुंतण हा मानवी स्वभाव. असा सोनचाफा मनात फुलायला हवा आणि ज्यासाठी फुलला हे त्याला नेमकं कळायला हवं. मग येणारा प्रत्येक दिवस हा प्रेमाचाच दिवस ठरेल. प्रेम म्हणजे ईश्वरी देणं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -