साक्षी माने
फेब्रुवारी महिना सुरू होताच चाहूल लागते ती ‘व्हॅलेंटाईन डे’ ची. प्रेमात पडलेले आणि प्रेमात पडू इच्छिणारे असे सगळेच जण या महिन्याची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. तसेच प्रेमाची कोणतीही परिभाषा नसते, प्रेम ही अशी भावना आहे ती कधीही कोणाविषयी निर्माण होऊ शकते. मुळात प्रेम हे कधी ठरवून होतं नाही फक्त जेव्हा ते होतं तेव्हा आपण आपल्यापूरते सीमित न राहता समोरच्याच्या भावनांचा जास्त विचार करतो. पण आजकालचं प्रेम हे जरा जास्तच मॉडर्न झाले असून आपण आपल्या हक्काच्या व्यक्तीवर किती प्रेम करतो हे दाखवण्याचा एक वेगळाच ट्रेंड सुरू आहे. पण खरं तर इतरांना दाखवण्यासाठी आपल्या भावनांचे जाहीर प्रदर्शन करणे ही संकल्पना काही वेळा थोडी खोचक वाटते आणि मग सहज एक प्रश्न पडतो तो म्हणजे हेच का खरं प्रेम जे जगजाहीर करून सांगावं लागतं की, हा फक्त ट्रेंड आहे जे इतर करतात म्हणून आपणही करायचं? परंतु काही वेळा आपण आपल्या भावना सगळ्यांसमोर व्यक्त करून जर समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद दिसणार असेल, तर लोक काय म्हणतील याची पर्वा न करता व्यक्त होण्यात काहीही चुकीचे नाही असं म्हणायला काही हरकत नाही.
अनेकांना वाटते व्हॅलेंटाईन वीक किंवा व्हॅलेंटाईन डे चे सेलिब्रेशन फक्त तरुण वर्गाचे पोरखेळ आहेत. पण खरं तर आपल्या बायकोच्या एका फोनवर सांगितलेली सामानाची यादी नवऱ्याने न विसरता आणणे, कधी तिच्या कामात तिला मदत करणं, तर कधी बायकोने आपल्या पतीच्या आवडत्या जेवणाचे बेत करणं किंवा नवऱ्याच्या बारीक सारीक आवडत्या गोष्टींची जास्त काळजी घेणे हे देखील प्रेम असून यासाठी कोणत्याही वीक किंवा डे ची गरज नसते. मुळात आपण किती प्रेम करतो हे दाखवण्यासाठी मोठमोठे गिफ्ट देण्याची काडीमात्र गरज नसते किंवा आय लव्ह यू बोलूनच भावना व्यक्त करता येतात असेही नसते. ‘मला तुझ्यावर विश्वास आहे’, ‘मी तुझ्यासोबत आहे’ हे शब्द आपल्या हक्काच्या व्यक्तीला जास्त आपलेसे करणारे असतात. तसेच गुलाब तर सगळेच देतात पण ते देताना त्याचे काटे समोरच्या व्यक्तीला दुखावणार नाही एवढी काळजी घेणारा साथीदार हा जास्त आपलासा वाटतो.
तसेच प्रेम हे कोणावरही होऊ शकते. जसं की सर्वात पहिलं प्रेम हे आपण आपल्याला आई-वडिलांवर, आजी-आजोबांवर, शिक्षकांवर, काहींना प्राण्यांवर जास्त माया असते, तर काहींना आपल्या वस्तू जास्त प्रिय वाटतात. एखादी गोष्ट आवडणे ही एक भावना असून त्यात काहीही गैर नाही पण ती आवडती गोष्ट, व्यक्ती आपलीच व्हावी, हा अट्टाहास चुकीचा आहे. कारण समोरच्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध किंवा भावनांची कदर न करणारा हट्ट चुकीचा असून ही वृत्ती चुकीच्या मार्गाकडे वळण घेऊ शकते. म्हणून प्रेम करणारे नाही, तर समजून घेणारे व आदर करणारे बना. कारण प्रेम शुद्ध आणि निःस्वार्थ असेल ना तर ते नातं आणखी निखळ आणि निर्मळ होतं. त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला एक गोष्ट हवी असते ती म्हणजे अंडरस्टँडिंग अर्थात समजूतदारपणा. म्हणून प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला काव्यात्मक स्वरूपात काही सांगावेसे वाटते ते म्हणजे,
ती ना समजदार आहे तर तू समजदार बन,
ती खचते, तर तू तीला सावर,
ती रूसते, तर तू मनव,
ती दुःखी आहे ,तर तू हसव,
ती चुकते, तर तू तिला थांबव,
नातं दोघांचं आहे ना मग एक बाजू कमजोर होत असेल, तर तू ती भक्कम कर. तसेच व्हॅलेंटाईन डे पुरते आपल्या साथीदारांवर प्रेम न करता ते वेळोवेळी व्यक्त करा कारण प्रेमाचा कोणताही दिवस नसतो, ते व्यक्त केल्याने नात्यातला गोडवा वाढतो आणि हेच क्षण नात्याची वीण घट्ट करणारे असतात.