पुणे : लाडकी बहीण योजनेत (Ladki Bhahin scheme) कोणताही नवीन निकष नाही, काही बहिणी त्या निकषाबाहेर गेल्या असल्याने त्यांनी योजनेचा लाभ घेणे सोडले. आम्ही कोणाचेही पैसे परत घेणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. तसेच दिल्ली विधानसभेत भाजपला मिळालेले यश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेने दाखविलेला विश्वास आहे, असे नमूद केले. या विजयाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
पुणे दौऱ्यात हिंदू गर्जना केसरी स्पर्धेच्या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी पत्रकार परीषदेत ते बोलत होते. स्पर्धेचे आयोजक धीरज घाटे आणि उद्योजक पुनीत बालन यावेळी उपस्थित होते.
Delhi Chief Minister 2025 : दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण? ‘या’ सात नावांची जोरदार चर्चा
लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात प्रश्न विचारले असता, फडणवीस म्हणाले, ‘आम्ही जनतेच्या पैशाचे कस्टोडीयन आहोत, आम्हालाही महालेखापालांना उत्तर द्यावे लागते. त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोहोचत असेल तर तो निश्चित बंद केला जाईल, त्याची आम्ही सुरुवात केली आहे. योजनेसाठी कुठलाही नवीन निकष नाही. योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते. त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे.