मुंबई : उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीत आणखी मोठी फूट पडेल. पुढील ९० दिवसांत टप्प्याटप्प्याने १० – १२ आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करतील, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. लवकरच उद्धव ठाकरे गटाचे लोकसभेतील किमान सहा खासदार शिवसेनेत प्रवेश करतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे गटाचे नऊ खासदार लोकसभेवर आणि २० आमदार विधानसभेवर निवडून गेले आहेत. यामुळे उद्धव गटाचे लोकसभेतील किमान सहा खासदार आणि विधानसभेतील किमान १४ आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करत असल्यास त्यांच्या विरोधात पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई करता येणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. जर लोकप्रतिनिधी टप्प्याटप्प्याने प्रवेश करणार असतील तर त्यांना राजीनामा देऊन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या तिकिटावर पोटनिवडणुकीद्वारे पुन्हा निवडून येऊन स्वतःची स्थिती मजबूत करता येईल. या दोन पैकी कोणताही पर्याय वापरुन लोकप्रतिनिधींनी उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर तो मविआसाठी घातक ठरणार आहे. राज्यात मविआचे मर्यादीत संख्याबळ आहे. यामुळे उद्धव गट फुटल्यास राज्यातील मविआ आणि राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडी आघाडी कमकुवत होण्याचा आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वापुढे प्रश्न निर्माण होण्याचाही धोका आहे. संसदेत वक्फ बोर्ड विधेयक, समान नागरी कायदा, एक देश – एक निवडणूक कायदा असे कायदे मंजुरीसाठी सादर होतील त्यावेळी विरोधकांची ताकद एकदम क्षीण झाली असल्यास त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होणार आहे. यामुळे उद्धव गटात काय घडते याकडे अनेकांचे लक्ष आहे.
उद्धव ठाकरे गटाचे लोकसभेतील खासदार
- अरविंद सावंत, दक्षिण मुंबई
- संजय देशमुख, यवतमाळ – वाशिम
- नागेश पाटील – आष्टीकर – हिंगोली
- संजय जाधव – परभणी
- राजाभाऊ वाजे – नाशिक
- संजय दिना पाटील – ईशान्य मुंबई
- भाऊसाहेब वाकचौरे – शिर्डी
- अनिल देसाई – दक्षिण मध्य मुंबई
- ओमप्रकाश राजेनिंबाळकर – धाराशिव (उस्मानाबाद)
GBS in Maharashtra : महाराष्ट्रात जीबीएसमुळे ६ मृत्यू, राज्यात जीबीएसचे १७३ रुग्ण
उद्धव ठाकरे गटाचे विधानसभेतील आमदार
- नितीन देशमुख, बाळापूर
- मनोज जामसुतकर, भायखळा
- अनंत नर, जोगेश्वरी पूर्व
- सिद्धार्थ खरात, मेहकर
- अजय चौधरी, शिवडी
- आदित्य ठाकरे, वरळी
- दिलीप सोपल, बार्शी
- गजानन लवाटे, दर्यापूर
- भास्कर जाधव, गुहागर
- महेश सावंत, माहीम
- कैलास घाडगे पाटील, धाराशिव (उस्मानाबाद)
- डॉ. राहुल पाटील, परभणी
- प्रवीण स्वामी, उमरगा
- सुनील राऊत, विक्रोळी
- सुनील प्रभू, दिंडोशी
- बाबाजी काळे, खेड आळंदी
- संजय देरकर, वणी
- संजय पोतनीस, कलिना
- वरुण सरदेसाई, वांद्रे पूर्व
- हारुन खान, वर्सोवा