नाशिक : सध्या सोशल मीडियावर रील बघणारे कोट्यवधी लोक आहेत. फावल्या वेळेत काम नसताना तरुणाई ते वृद्धांपर्यंतच जीवन रील मध्ये व्यग्र होत चाललं आहे. अगदी उठता, बसता, चालता फक्त रील एके रील. या रिलच्या नादात अनेकांनी आपले प्राण पणाला लावले आहे. अशीच एक नाशिक मध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. वडिलांच्या निष्काळजीपणामुळे एका पाच वर्षीय मुलाचा दुर्दैवी अपघात घडला आहे. या अपघातात चिमुकल्याने प्राण गमावले.
नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन या पंचतारांकित हॉटेलच्या पार्कींगमध्ये ध्रुव अजित राजपूत ( वय ५ ) हॉटेलच्या गार्डनमध्ये खेळून वडिलांसोबत परत जात असताना हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. चिमुरड्याचे वडील अजित राजपूत हे मुलगा ध्रुव आणि मुलगी हर्षदाला हॉटेलच्या गार्डनमध्ये खेळण्याठी घेऊन आले होते. मात्र खेळून झाल्यानंतर घराकडे जात असताना अजित यांचं लक्ष मोबाईलमध्ये होते. तितक्यात ध्रुव वडिलांचा हात सोडून लॉबीमध्ये जाताना ईनोव्हा गाडीने त्याला चिरडलं. ध्रुवला गाडी दिसल्यानंतर त्याने थांबण्याचा प्रयत्न केला असता तो घसरुन गाडीच्या डाव्या बाजूच्या चाकासमोरच पडला आणि चाक त्याच्या अंगावरुन गेलं.
मुलाच्या अंगावरुन कार गेल्याचं लक्षात आल्यानंतर अजित यांना धक्काच बसला. ते मुलाला उचलण्यासाठी पुढे धावले. काही क्षणांमध्ये घटनास्थळावर लोकांची गर्दी झाली. ध्रुव बेशुद्ध झाल्यासारखा निपचित झाल्याने अजित चांगलेच संतापले. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेजमध्ये इनोव्हाच्या चालकाला मारहाण करण्यात आल्याचंही दिसत आहे. दरम्यान पालकांचा हलगर्जीपणा वाढला आहे का? यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.