Thursday, March 27, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणमत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे रत्नागिरीचे संपर्क मंत्री

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे रत्नागिरीचे संपर्क मंत्री

रत्नागिरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांना भारतीय जनता पक्षाने रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपा संघटन अधिक बळकट होण्यास चालना मिळणार आहे.

प्रदेश भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय सदस्यता अभियान अंतर्गत मुंबईत श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात प्रदेश कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सहसंघटन मंत्री शिव प्रकाश, राष्ट्रीय सचिव आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, सरचिटणीस माधवी नाईक, सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस विजय चौधरी तसेच राज्यातील सर्व मंत्री, आमदार आणि प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Mumbai Goa Highway New Deadline : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल–इंदापूर टप्प्याचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणार

यावेळी राज्यातील भाजपच्या संपर्क मंत्र्यांची घोषणा करण्यात आली. ज्या जिल्ह्यात भाजपाचा आमदार किंवा मंत्री नाही त्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून भाजपने आपल्या पक्षाच्या मंत्र्यांवर त्या जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्यावर रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून पक्षाने जबाबदारी सोपवली आहे.

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास खात्याचे मंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रथमच रत्नागिरीत आलेले श्री. राणे यांनी रत्नागिरी शहरानजीकच्या मिरकरवाडा बंदरातील वर्षानुवर्षे असलेले अतिक्रमण अवघ्या १५ दिवसांत हटवले. त्यांनी केलेली ही धडक कारवाई अद्यापही चर्चेत असतानाच आता पक्षाने या जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या विचारांचे मतदार आहेत. अशा वेळी रत्नागिरीत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी श्री. राणे यांच्यासारखे आक्रमक नेतृत्व आवश्यक असल्यानेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने नवी जबाबदारी श्री. राणे यांच्याकडे सोपवली असून जिल्हा भाजपकडून या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -