पालघर : दहावीच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. महाविद्यालयांमध्ये सध्या निरोप समारंभाचे वारे वाहत आहेत. अशातच पालघरमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात भाषण करत असताना शिक्षकाला गहिवरुन आले. दाटून आलेला त्यांचा तो हुंदका त्यांच्यासाठी काळच ठरला. बोलता बोलता ते अचानक थांबले. भारावलेल्या वातावरणात सर्वजण यावेळी हळवे झाले होते. तोच काही क्षणात ते शिक्षक जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी आलेल्या या शिक्षकानेच या मुलांसह शाळेचा देखिल अखेरचा निरोप घेतला. ही दुर्दैवी घटना पालघर जिल्ह्यातील मनोर येथे घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Maharashtrian Comedian : माजी मुख्यमंत्री शिंदेंच्या नातवावर जोक करणाऱ्या विनोदवीराला मारहाण
पालघर तालुक्यातील मनोर येथे लालबहादूर शास्त्री शाळेत काल (दि. ४) दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. या निरोप समारंभात अनेक शिक्षकांनी मुलांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. मुलांनीही यावेळेस शिक्षकांसाठी आदराप्रती भाषण दिले. दरम्यान समारंभ मोठ्या भावनिक वातावरणात सुरु असतानाच शिक्षक संजय लोहार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पोडियमवर आले. भाषण करताना हळवे झालेले संजय लोहार भाषण देत असतानाच स्तब्ध झाले आणि काही क्षणातच पोडियमसह कोसळले.
संजय यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने शाळेतील विद्यार्थ्यांसह पालक आणि आजूबाजूच्या गावातील रहिवाशांनीही हळहळ व्यक्त केली आहे.