नवी दिल्ली : काही जण स्वतःच्या मनोरंजनासाठी गरिबांच्या झोपड्यांमध्ये फोटो सेशन करतात, त्यांना संसदेत गरिबांचा उल्लेख कंटाळवाणा वाटेल. ज्यांना राहण्यास छत नाही त्यांनाच समजते की घर मिळण्याचे मूल्य काय आहे. विकास करुन दाखवायला हिंमत लागते. केंद्र सरकारने आतापर्यंत देशातील गरिबांना ४ कोटी घरे दिली आहेत. पूर्वी महिलांना शौचालय व्यवस्थेअभावी खूप त्रास सहन करावा लागला. ज्यांच्याकडे या सुविधा आहेत त्यांना पीडितांच्या समस्या समजू शकत नाही. आम्ही १२ कोटी पेक्षा अधिक शौचालये बांधली. ५ वर्षांत १२ कोटी घरात थेट पाणी पुरवठा केला. आम्ही देशातील जनतेला खरा विकास दिला, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षावर हल्लाबोल केला. ते मंगळवारी (दि. ४) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना बोलत होते.
दहावीची परिक्षा झाल्यावर ‘वर्षा’वर जाणार; उलटसूलट चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीस यांचा खुलासा
आम्ही संविधान जगणारे लोक आहोत. त्यामुळे आम्ही आमच्या सत्ताकाळात संविधानाचा कायम आदर राखला, विरोधी नेत्यांनाही आम्ही सन्मानाने वागवले.आम्ही कायम विरोधी नेत्यांचा सन्मान राखला. संविधानात जशी कलमे आहेत. तसे संविधानाचे एक स्पिरिट देखील आहे. तसेच संविधानाला मजबुती देण्यासाठी संविधानाच्या भावनेने जगावे लागते. आज मी उदाहरणासहित हे सांगू इच्छितो की आम्ही ते लोक आहोत जे संविधानाप्रमाणे जगतात. गुजरातमध्ये सर्वाधिक काळ काँग्रेसची सरकारे राहिली आहेत, पण मी भाजपचा मुख्यमंत्री असतानाही हे काम केले. कारण आम्ही संविधानाप्रमाणे जगणे जाणतो. त्याचबरोबर २०१४ मध्ये जेव्हा आम्ही सत्तेत आलो, तेव्हा विरोधीपक्ष नेता नव्हता. कारण त्यांचे तेवढे संख्याबळ नव्हते. त्यावेळी भारताच्या अनेक कायद्याप्रमाणे आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य होते, त्या कायद्यांप्रमाणे काम करण्याची. पण तेव्हा विरोधीपक्ष नेताच नव्हता. पण तरीही आम्ही संविधान पाळणारे आहोत म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की, भलेही विरोधीपक्षनेता नसेल तरी आम्ही बैठकांमध्ये या नेत्याला बोलावणार असा निर्णय घेतला होता, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
काही जणांचे गरिबांच्या झोपड्यांमध्ये फोटो सेशन
काही जण स्वतःच्या मनोरंजनासाठी गरिबांच्या झोपड्यांमध्ये फोटो सेशन करतात, त्यांना संसदेत गरिबांचा उल्लेख कंटाळवाणा वाटेल. ज्यांना राहण्यास छत नाही त्यांनाच समजते की घर मिळण्याचे मूल्य काय आहे. ज्यांच्याकडे या सुविधा आहेत त्यांना पीडितांच्या समस्या समजू शकत नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना लगावला.
आम्ही ते पैसे ‘शीशमहल’ बांधण्यासाठी वापरले नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, पूर्वी वर्तमानपत्रांच्या मथळ्या घोटाळे आणि भ्रष्टाचाराशी संबंधित असायच्या. आता १० वर्षे उलटून गेली आहेत, कोट्यवधी रुपये वाचले आहेत. ते पैसे जनतेसाठी वापरले गेले आहेत. आम्ही राबवलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून पैशांची खूप बचत झाली आहेत; परंतु आम्ही ते पैसे ‘शीशमहल’ बांधण्यासाठी वापरले नाहीत, त्याऐवजी आम्ही ते पैसे राष्ट्र उभारण्यासाठी वापरले आहेत, असे सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
आयकर कमी करून मध्यमवर्गीयांच्या बचतीत वाढ केली
मागील दहा वर्षांत केंद्र सरकारने आयकर कमी करून मध्यमवर्गीयांच्या बचतीत वाढ केली आहे. २०१४ पूर्वीच्या सरकारच्या धोरणांमुळे मध्यमवर्गीयांच्या जीवनावर परिणाम झाला. आम्ही हळूहळू यामध्ये सुधारणा केल्या. २०१३-२०१४ मध्ये फक्त २ लाख रुपयांच्या उत्पन्नावर आयकर सवलत होती. आज १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर आयकर सवलत आहे. १ एप्रिलनंतर देशातील पगारदार वर्गाला १२.७५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही, असेही पंतप्रधानांनी सांगितले.