प्रयागराज: प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभात तिसरे पवित्र अमृत स्नानाचे आयोजन वसंत पंचमीनिमित्त सोमवारी पहाटे ५: २३ ते ०६: १६ या वेळेत करण्यात आले आहे. या पर्वात सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यासह जगभरातून रोज कोटीच्या संख्येने भाविक रविवारी दुपारपासून मोठ्या संख्येने याठिकाणी येत आहेत. त्रिवेणी संगमात कोट्यवधी लोकांकडून आस्थेची डुबकी घेतली जाते.
महाकुंभात पहिले अमृत स्नान मकर संक्रांतीच्या दिवशी संपन्न झाले, तर दुसरे अमृत स्नान मौनी अमावस्येदिवशी पार पडले, तर आता तिसरे अमृत स्नान वसंत पंचमीच्या निमित्ताने होणार आहे. या सोहळ्यात भाविकांच्या सुरक्षेसह अन्य कोणत्याही पातळीवर चुकीला वाव असता कामा नये, असे निर्देश देत महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी प्रकरणी जवाबदार असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी स्पष्ट केले. वसंत पंचमी स्नान महोत्सवाच्या तयारी आढावा प्रसंगी ते बोलत होते.
वसंत पंचमीच्या अमृत स्नानाच्या पर्वात भाविकांना सुरक्षित स्नान करण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यानुसार संगम तटावर २८ मोक्याची ठिकाणे बनविण्यात आली आहेत. या ठिकाणी पोलिसांसोबतच आरएएफ आणि पॅरामिलेट्रीचे जवान यांची संयुक्त टीम घटनास्थळी तैनात असतील. पंचमी स्नान महोत्सवात कोणतीही त्रुटी न ठेवता व्यवस्था करण्याचे निर्देश यावेळी योगी आदित्यनाथ यांनी दिले. यावेळी आखाड्यांची पारंपारिक मिरवणूक काढली जाईल. तत्पूर्वी संत, कल्पवासी, भक्त आणि पर्यटकांची सुरक्षा आणि सुविधा सुनिश्चित केली पाहिजे. कोणत्याही पातळीवर चुकीला वाव असता कामा नये, असे निर्देशही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना दिले. महाकुंभमेळा परिसरातील पार्किंगची जागा वाढवावी. भाविकांना शक्य तितके कमी चालावे लागेल, अशी व्यवस्था करा. महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी पोलीस अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांना दिले.
महाकुंभ’ चेंगराचेंगरी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेगरीप्रनणी दाखल जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटनुसार, ही जनहित याचिका ३ फेब्रुवारीसाठी सूचीबद्ध करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात २९ जानेवारी रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ३० जणांचा मृत्यु झाला होता आणि ६० जण जखमी झाले होते. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अधिकान्यांवर कारवाई करावी, तसेच, सर्व राज्यांना प्रयागराजमधील त्यांच्या सुविधा केंद्रांमध्ये भाविकांना सुरक्षा उपाय आणि मार्गदर्शक तत्त्वांबद्दल मूलभूत माहित्ती देण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका वकील विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती सजय कुमार यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.