ऋतुजा केळकर
आजचा सूर्य हा आपल्यासाठी एक नवी पहाट घेऊन आलाय. तो देखील एका नवीन महिन्यासोबत. आपल्या मराठी महिन्यांनुसार आज ‘माघ’ महिन्याचा प्रारंभ झाला आहे. माघ महिना हा अनेक गोष्टींकरिता पवित्र महिना मानला जातो. याच महिन्यात आता चारच दिवसांनी सुरू होणारा माघी गणेशोत्सव हा एक सर्वात आनंदाचा आणि उत्साहाचा हिंदू सण आहे.
शिवाय आज गुप्त नवरात्री आरंभ झाला आहे. मुसलमानांकरिता देखील हा माघ महिना हा तितकाच महत्त्वाचा आहे कारण याच महिन्यात त्यांच्या रजब महिन्याची समाप्ती आणि शाबान महिन्याचा प्रारंभ होतो. तसेच याच महिन्याच्या आसपास पैगंबर मुहम्मद यांचा जन्मदिन, जो मौलुद-ए-नबी म्हणून ओळखला जातो. म्हणूनच सर्वार्थाने ‘माघ’ हा महिना हिंदू आणि मुसलमान या दोघांकरिता अत्यंत महत्वाचा महिना आहे.
माघ महिन्यातील आता मला जी गोष्ट भावली ती मी तुम्हाला सांगते. ‘माघ’ या शब्दाची जर फोड केली तर आपल्याला लक्षात येईल ते म्हणजे ‘मा’ खरतर ‘श्री विष्णू’ प्रतीत होतात. केशरगौर असे श्री विष्णू हे माझ्याकरिताच नव्हे तर संपूर्ण हिंदुत्वाकरिता आराध्य आहेत. कांतारब्रम्हात जर का कोणी आपल्या आपल्या रक्षणाकरिता अत्यंत त्वरेने धावून येतील तर त्यातील एक देव म्हणजे ‘श्री विष्णू’. श्रीकृष्णाच्या रूपात ज्यांनी भगवतगीतेचे अमृत देऊन जगातला जगण्याचा महामंत्र दिला ते श्री विष्णू. त्यांचा हा परम पावन महिना म्हणजे माघ महिना. त्यामुळे या महिन्यात ‘ओम वैष्णवे नमः’ या महामंत्राचा जमेल तितका आणि जमेल तेव्हा जप करावा जेणेकरून आपल्याला प्रत्येक ठिकाणी यश, किर्ती आणि सुसंध्या मिळत जातील.
‘माघ’ महिन्यातील आणखीन एक गोष्ट जी मला भावली ती म्हणजे ‘घ’ म्हणजे ‘घायाम’ म्हणजेच ‘मौल्यवान हिरा’ आपले मानवी आयुष्य हे एक अत्यंत मौल्यवान हिऱ्यासारखे आहे. ते काम, क्रोध, मद आणि मत्सर यांसारख्या रीपुंमुळे नष्ट करण्यापेक्षा त्याला कष्टाने सुकर्माच्या छिन्नीने असे पैलू पाडा की, त्याच्या आकृतीबंधातून परावर्तित होणाऱ्या परमेश्वरी कृपेच्या सूर्यकिरणांनी आपले जीवन झळाळून तसेच बहरून निघेल.
अखेरीस इतकच सांगेन की, श्री रामालाही वनवास चुकला नाही आणि दशरथाला पुत्रवियोग. आपल्या आयुष्यातील आपले भोग हे तर चुकणारच नाहीत पण अपूर्व आणि अलौकिकत्व प्राप्त करून या जीवनाच्या द्रौपादीय पेचातून सुटून ‘नरो वा कुंजरो वा’ अशी भूमिका घेणे वाट्याला यायला नको असेल तर आपला आवाका नेहमीच अंतरात्म्याच्या हाकेचे संकेत शोधून त्याच दिशेने मार्गक्रमण करण्याचा यत्न करत राहा. मग माझ्या शब्दांत सांगायचं झालं तर,
‘माघी गणेश हृदयी
वसेल जर तुझ्या
कृत्यात श्री विष्णू वसे
आयुष्याचा होई हिरा
आणिक तुझा
सूर्य कधी न मावळे’