Tuesday, May 13, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

महापालिकेतर्फे मुंबईकरांना शुद्ध-स्वच्छ पाण्याचा पुरवठा! अफवांवर विश्वास नको

महापालिकेतर्फे मुंबईकरांना शुद्ध-स्वच्छ पाण्याचा पुरवठा! अफवांवर विश्वास नको

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पालिकेतर्फे आवाहन


मुंबई : पालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेपैकी जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टरमध्ये बिघाड झाल्याने फिल्टर न करता पाण्याचा पुरवठा होत असल्याचे संदेश समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले असून हे संदेश खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत, त्यामुळे समाज माध्यमांवरील दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन मंगळवारी पालिकेकडून करण्यात आले आहे. तसेच मुंबईकरांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.


पालिकेतर्फे मुंबईकरांना दररोज ४००० दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा करताना, जागतिक आरोग्य संघटना आणि आयएस १०५००-२०१२ ने प्रमाणित केलेल्या मानकांनुसारच जलशुद्धीकरण प्रक्रिया केली जाते. एकूणच, मुंबईकरांना शुद्ध, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो.


पालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेत पांजरापूर (१३६५ दशलक्ष लीटर प्रतिदिन), भांडुप संकुल (२८१० दशलक्ष लीटर प्रतिदिन), विहार (१०० दशलक्ष लीटर प्रतिदिन) आणि तुळशी (१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन) येथे पाणी शुद्धीकरणाकरिता आणले जाते. या पाण्यावर पॉली एल्युमिनियम क्लोराईड (पीएसी), रॅपिड सँड फिल्टर्स, निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीनचा वापर आदी प्रक्रिया केली जाते. त्यानंतर, शुद्ध पाणी मुंबईकरांना पुरवले जाते.


एकूणच मुंबईकरांना दररोज शुद्ध, निर्जंतुकीकरण केलेले आणि पूर्णपणे स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे समाज माध्यमांवरील खोट्या, दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Comments
Add Comment