मीनाक्षी जगदाळे
ही लोकं स्वतःवर किती कामं करतात, इतरांकडून कोणत्या चांगल्या गोष्टी शिकतात का? त्या अमलात आणण्याचा प्रयत्न करतात का? की स्वतःचंच खरं करत बसतात हे पण लक्षात घ्या. काय चूक, काय बरोबर, काय खरं, काय खोटं यातील स्पष्ट फरक हे लोकं समजू शकतात का? तेवढी हुशारी त्यांच्याकडे आहे का हे बघा. ही लोकं सत्य परिस्थिती स्वीकारतात का? कोणत्याही त्रासदायक परिस्थितीमध्ये असे लोकं इतरांना दोष देतात की सगळ्यांना एकत्र घेऊन विश्वासाने बोलून प्रश्न सोडवतात ते तपासा. यांना स्वतःची वैयक्तिक विचारशैली आहे का, की हे कायम इतरांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून त्याचं अंध अनुकरण करतात हे तपासून बघा. अशा प्रकारे वागणारे लोकं फक्त स्वतःच्याच कोषात राहतात की समाजाच्या दुनियादारीचा त्यांना थोडाफार अनुभव आहे हे लक्षात घ्या. फक्त घर आणि घरातील लोकांबद्दल बोलणं, घरातच राजकारण करणं याही पलीकडे त्यांचं जग आहे का? ते दररोज नवीन काय शिकतात, नवीन काय करतात? वेगवेगळ्या स्तरातील, सर्व गुण संपन्न, प्रसिद्ध, उच्च शिक्षित, नावलौकिक असलेल्या लोकांना ते मोकळेपणाने भेटून, बोलून, विचारांची देवाण-घेवाण करतात का हा मुद्दा पण लक्षात घ्या. अशा प्रवृत्तीचे लोकं स्वतःला बदलण्यासाठी काय, किती मेहनत घेतात, त्यासाठी काय प्रयत्न करतात? इतरांचं बोलणं शांतपणे ऐकून घेण्याची त्यांची मनस्थिती असते का? ही लोकं इतरांच्या भावनांचा आदर करतात का? दुसऱ्याला किमत देतात का, दुसऱ्याचे विचार, मत ऐकून घेतात का हा पण विचार करा. ज्यांच्यामध्ये इतरांचं ऐकून घेण्याची वृत्ती असते ते कायम प्रगती करणे, सुधारणा करणे, नवीन शिकणे, स्वतःमध्ये बदल घडवणे या दिशेने वाटचाल करतात. यातील कोणतेही गुणधर्म त्यांच्यात नसतील तर तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करणे पूर्ण चुकीचे आहे की ते तुमच्याशी चांगले वागतील, बोलतील. वर्षानुवर्षे जर असे लोकं याच मानसिकतेमध्ये आणि असच जगत असतील तर ते बदलणे अशक्य असते. त्यामुळे त्यांना तुमची जाणीव होईल, ते तुमच्याशी गोड होतील, खरं बोलतील, त्यांच्या मनाला पाझर फुटेल वगैरे विचार करण्यात स्वतःचा वेळ, श्रम वाया घालवणे, वाट बघत बसणेे निरर्थक आहे.
भविष्यात कधी न कधी कोणत्याही कारणास्तव त्यांना जर तुमची गरज पडली, ते बोलायला आले, मदत मागायला किंवा नातं टिकवण्यासाठी पुढाकार घ्यायला आले तर त्यांना त्यांच्या या वागणुकीची जाणीव नक्कीच करून द्या.
कौटुंबिक समस्या घेऊन समुपदेशनाला आलेले अनेक लोकं घरातील अशा वातावरणामुळे शारीरिक, मानसिक आजार मागे लावून घेतात. सतत आपल्याला अशी वागणूक का मिळते, आपलं काय चुकलं, आपण कुठे कमी पडतोय अशी अपराधीपणाची भावना मनात घेऊन जगत राहतात. घरातील काही ठरावीक लोकांमुळे, त्यांच्या वागण्या-बोलण्यामुळे स्वतःला डिस्टर्ब करून घेणे, कोसत राहणे, स्वतःला सतत कमी समजणे यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य पूर्ण बिघडून जाते. घरोघरी थोडे तरी असे सदस्य असतात की ज्यांची मानसिकता दूषित असते ते प्रत्येकाला त्रासदायक ठरत असतात, सगळ्यांच्या बोलण्याचा उलटा अर्थ काढणे, सगळ्यांना नावं ठेवत राहणे हेच त्यांचं रुटीन असतं.अशा वृत्तीच्या लोकांकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपलं ध्येय, आपली कामं, आरोग्य याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचे असते. या लोकांना हवेच असते की तुम्ही जास्तीत जास्त वाईट सिद्ध व्हावे, तुम्हाला त्यांच्या वागण्यातून त्रास देणे त्यांचा हेतू असतो. त्यामुळे अशा लोकांना नको तेवढं महत्त्व देऊन आपलं मानसिक संतुलन अजिबात ढासळू देऊ नये. इतरांना त्रास देण्याची, घालून पाडून बोलण्याची, टॉर्चर करण्याची त्यांची वृत्ती कधीही बदलणारी नसते. कोणीही कधीही आपलं मानसिक खच्चीकरण करू शकेल इतकं कमजोर अजिबात राहू नका. जे आपल्याला प्रेम करतात, आदर देतात, सांभाळून, समजावून घेतात त्यांना नक्कीच तुमचं शंभर टक्के द्या पण ज्यांना तुमची गरज नाही, तुम्हाला किंमत द्यायची नाही, जे तुमच्याबद्दल अपप्रचार करतात त्यांना स्वतःच्या आयुष्यात थारा देणे, त्यांचा विचार करणे मूर्खपणा आहे. समुपदेशन दरम्यान घरगुती तक्रारी सोडवताना प्रत्येक घरात एखादी तरी व्यक्ती अशी असल्याचे निदर्शनास येते जी पूर्ण कुटुंबासाठी मनस्ताप असते.
घरासाठी, लोकांसाठी ती फार काही विशेष करत तर नसते पण आपण खूप त्यागी, महान, वेगळे असल्याचा आव ही व्यक्ती आणत असते. घरातील अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत ती सगळ्यांना स्वतःचा शहाणपणा शिकवत असते, सतत अति बडबड करणे, घरातील प्रत्येक घटनेचा न्याय-निवाडा करणे, अति सल्ले देणे, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक नात्यात तोंड घालणे याची सवय असते. अशा घरातील नमुन्यांमुळे सगळेच वैतागून गेलेले असतात. पण त्या व्यक्तीला कसं सामोरं जावं हे त्यांना समजत नसतं. सगळ्यांपेक्षा स्वतःला खूप वेगळं दाखवून, स्वतःच महत्त्व वाढवून घेणे, इतरांच्या कामात, इतर नातेसंबंधांमध्ये सतत ढवळाढवळ करणे यात ही लोकं पटाईत असतात. स्वतःचं आयुष्य तर यांना नीट जगता आलेले नसते? योग्य निर्णय घेता आलेले नसतात, यांच्या आयुष्यात फार काही करण्यासारखे नसते म्हणून इतरांनापण सारखं मानसिकदृष्टीने कमकुवत करत राहणे, इतरांच्या आयुष्यात हस्तक्षेप करणे, घरातील वातावरण दूषित करणे यांच्यासाठी खेळ असतो. त्यामुळे असे लोक जगात, समाजात, घरात कायम असणारच आहेत. आपण आपल्या अनुभवातून, कौशल्यातून, पद्धतशीरपणे अशा लोकांपासून सुरक्षित ठेवायचं इतकंच आपल्या हातात आहे.
[email protected]