राजकोट: टीम इंडिया आणि इंग्लंडचा संघ यांच्यात राजकोट येथे आज तिसरा टी-२० सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने २० षटकांत १७१ धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी १७२ धावांचे आव्हान मिळाले आहे. बेन डकेटने २६ बॉलवर अर्धशतक ठोकले.
इंग्लंडने २० षटकांत ९ विकेट गमावताना १७१ धावा केल्या. टीम इंडियासाठी वरूण चक्रवर्तीने घातक गोलंदाजी केली. त्याने ५ विकेट मिळवल्या. तर इंग्लंडसाठी बेन डकेटने अर्धशतक लगावले. त्याने २८ चेंडूचा सामना करताना ५१ धावा केल्या. डकेटने ७ चौकार आणि २ षटकार लावले. तर दुसरीकडे लियाम लिव्हिंगस्टोनने ४३ धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. जोस बटलरने २४ धावा करत योगदान दिले.
५ विकेटसह वरूण चक्रवर्तीने रचला इतिहास
वरूण चक्रवर्तीने ५ विकेट घेण्यासोबतच इतिहास रचला आहे. तो भारत आणि इंग्लंड यांच्यातील द्वीपक्षीय टी-२० मालिकेत १०हून अधिक विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. याआधी युजवेंद्रच्या नावावर एका मालिकेत सर्वाधिक ८ विकेट घेण्याचा मान होता. इंग्लंडकडून एका मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड क्रिस जॉर्डनच्या नावावर आहे.