मुंबई: भारतीय क्रिकेट संघ आता आपल्या पुढील मिशनच्या अगदी जवळ आला आहे. संघाला घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. याचा पहिला सामना २२ जानेवारीला कोलकाताच्या इडन गार्डनवर रंगणार आहे. या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादव नेतृत्व करत आहे.
कर्णधार म्हणून सूर्याची आपल्या करिअरमधील सहावी द्वीपक्षीय टी-२० मालिका आहे. त्याच्या नेतृत्वात आतापर्यंत जबरदस्त रेकॉर्ड राहिला आहे. सूर्याच्या नेतृत्वात भारतीय संघाला अद्याप एकही पराभव मिळालेला नाही. सोबतच सूर्या इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत पहिल्यांदा नेतृत्व करत आहे.
सूर्याच्या नेतृत्वात या ४ संघाना दिली मात
सूर्यकुमार यादवला पहिल्यांदा नेतृत्व करण्याची संधी २०२३मध्ये मिळाली होती. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर टी-२० मालिकेचे नेतृत्व केले होते. पाच सामन्यांच्या या टी-२० मालिकेत भारतीय संघाने ४-१ अशी बाजी मारली होती. यानंतर सूर्याच्या नेतृत्वात भारतीय संघांचा विजयरथ पुढे चालत राहिला.
ऑस्ट्रेलियानंतर सूर्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा दौरा केला. येथे २ सामन्यांची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. यानंतर श्रीलंकेला त्यांच्याच भूमीवर २-० असे हरवले. तर बांगलादेशला ३-० असे क्लीन स्वीप केले.
सूर्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने शेवटची टी-२० मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोव्हेंबर २०२४मध्ये खेळली होती. चार सामन्यांच्या या मालिकेत द्वीपक्षीय टी-२० मालिका भारतीय संघाने ३-१ अशी आपल्या नावे केली होती. आता सूर्यासमोर इंग्लंड संघाचे आव्हान आहे.