नाशिक : प्रेमविवाह केलेल्या पत्नीकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून पतीने व्हिक्टोरिया पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या(Suicide) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मनोहर नथू गवांदे (रा. उल्हासनगर, जि. ठाणे) यांचा मुलगा प्रीतम नथू गवांदे व आरोपी भारती गवांदे (वय ३२, दोघेही रा. पाथर्डी फाटा) यांनी प्रेमविवाह केला होता. दरम्यान, लग्नानंतर कोरोनाच्या साथीमुळे प्रीतम आर्थिक संकटात सापडला. त्यामुळे आरोपी पत्नीने “मी तुझ्याशी प्रेम करून फसले. तू भिकारी आहेस. मला घटस्फोट दे,” असे म्हणून पती प्रीतम याला वडिलांकडून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली; मात्र त्यास प्रीतमने नकार दिला असता आरोपी पत्नीने त्याच्याशी वेळोवेळी भांडण करून वाद घातला. त्यानंतर पत्नीला परपुरुषाबरोबर आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्याने त्याचा संताप झाला.
प्रीतमला पत्नीने शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले. प्रीतमने दि. १२ ऑगस्ट रोजी व्हिक्टोरिया पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी मयत प्रीतमचे वडील मनोहर गवांदे यांनी न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार पती प्रीतम याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी भारती गवांदेविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.