मुंबई (मानसी खांबे) : वानखेडे स्टेडियम उभारण्याआधी मुंबईत क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या मालकीचं ब्रेबॉर्न हे एकमेव क्रिकेट स्टेडियम होते. वानखेडे स्टेडियमच्या आधी मुंबईतील सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने CCI (क्रिकेट क्लब ऑफ इंडिया)च्या अंतर्गत असलेल्या या स्टेडियमवर खेळले जायचे. त्यानुसार १९७२ साली महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि क्रिकेटप्रेमी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी या मैदानात सामना खेळवण्याचे ठरवले. मात्र त्यावेळी सीसीआयचे अध्यक्ष ख्यातनाम क्रिकेटपटू विजय मर्चंट यांनी वानखेडे यांची सामना खेळवण्याची मागणी फेटाळून लावली. यावेळी शब्दाला शब्द लागून वातावरणही गरम झाले होते. दरम्यान एका मराठी माणसाच्या केलेला अपमानामुळे या वागणुकीचा बदला घेण्यासाठी ५० वर्षापूर्वी मुंबईतील चर्चगेट येथे अवघ्या १३ महिन्यात वानखेडे स्टेडियम उभारण्यात आले.
क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला आज १९ जानेवारी रोजी ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे वानखेडे स्टेडियमवर भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये क्रिकेटचा देवता म्हणजेच सचिन तेंडुलकर यासह मुंबई क्रिकेट संघाचे तसेच भारतीय क्रिकेटपटूंनी हजेरी लावली आहे. तसेच अजय-अतुल आणि अवधुत गुप्ते यांचा गाण्यांचा कार्यक्रम देखील होत आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून वानखेडेच्या पन्नाशीच्या कार्यक्रमादरम्यान मुंबईचे खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पुष्पगुच्छ आणि वानखेडे स्टेडियमची प्रतिकृती खेळाडूंना देण्यात आली. सर्वप्रथम सुनील गावस्कर, त्यानंतर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, डायना इडुलजी यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान स्टेजवर सचिन तेंडुलकर याने स्टेडियम वरील काही आठवणी सांगितल्या. मैदानातील पहिला दिवस ते निवृत्ती दिवसापर्यंतच्या सर्व आठवणी सचिनने जागवल्या. तसेच मैदानात मित्रांसोबत केलेली धमालमस्तीही सांगितली. यावेळी चाहत्यांकडून केल्या जाणाऱ्या ‘सचिन- सचिन’च्या घोषणांनी संपूर्ण स्टेडियम दुमदुमून गेले.