नवी दिल्ली : भाजप आणि आरएसएसने प्रत्येक संस्था ताब्यात घेतली आहे आणि आता ते भाजप, आरएसएस आणि भारतीय राज्यांविरुद्ध लढत आहेत, असे वक्तव्य काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते. त्या विरोधात गुवाहाटीतील पान बाजार पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ आणि १९७(१) डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भारताचे सार्वभौमत्व एकता आणि अखंडता धोक्यात आणणाऱ्या कृत्यांसाठी हा गुन्हा दाखल केला जातो. राहुल गांधी यांनी १५ जानेवारी रोजी दिल्लीतील कोटला रोड येथील काँग्रेस पक्षाच्या नवीन मुख्यालयाच्या उद्घाटनादरम्यान उपरोक्त वक्तव्य केले होते.
गुवाहाटी उच्च न्यायालयाचे वकील तक्रारदार मोनजीत चेतिया यांनी आरोप केला आहे की, राहुल गांधींच्या वक्तव्याने स्वीकारार्ह भाषणाची मर्यादा ओलांडली आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. सध्या विरोधी पक्षनेतेपद भूषविणाऱ्या एका व्यक्तीने सार्वजनिक व्यासपीठावरून दिलेले वक्तव्य ही सामान्य राजकीय टिप्पणी नाही.
राहुल यांच्या या वक्तव्यामुळे हिंदू सेनेने दिल्ली पोलीस आयुक्तांकडे तक्रारही केली होती, ज्यामध्ये राहुल यांच्या देशविरोधी वक्तव्याबद्दल कारवाई करण्यात यावी, असे म्हटले होते.
तक्रारदार चेतिया यांनी एफआयआरमध्ये दावा केला आहे की, राहुल गांधींची ही टिप्पणी निवडणुकीत वारंवार झालेल्या पराभवाच्या निराशेने प्रेरित आहे. विरोधी पक्षनेते म्हणून, लोकशाही संस्थांवर जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्याची जबाबदारी राहुल गांधींवर आहे, परंतु त्याऐवजी त्यांनी आपल्या व्यासपीठाचा फायदा घेऊन खोटे बोलणे आणि बंडखोरी करणे पसंत केले, ज्यामुळे भारताची एकता आणि सार्वभौमत्व धोक्यात आले. लोकशाही मार्गाने जनतेचा विश्वास संपादन करण्यात असमर्थ ठरल्यानंतर आरोपी आता केंद्र सरकार आणि भारताच्या राज्यांविरुद्ध असंतोष भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.