पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगतिशील, आत्मनिर्भर आणि एकसंध भारताप्रति आपला दृष्टिकोन प्रदर्शित करत अनेक धडाडीच्या परिवर्तनात्मक उपक्रमांसह २०२५ वर्षाची सुरुवात केली आहे. पायाभूत सुविधा आणि वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यापासून, युवकांना सशक्त बनवणे आणि भारताची सांस्कृतिक विविधता साजरी करण्यापर्यंत, त्यांच्या नेतृत्वाने पुढील उल्लेखनीय वर्षासाठी एक दृष्टिकोन निश्चित केला आहे.
२०२५ मधील पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या कल्याणावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून नववर्षाची सुरुवात झाली. सरकारने शेतकऱ्यांसाठी खतांच्या किफायतशीर किमती खात्रीशीर करून, डायअमोनियम फॉस्फेट (डीएपी)साठी एकरकमी विशेष पॅकेज देण्यास मंजुरी दिली. हा निर्णय भारताचा कृषीविषयक कणा मजबूत करण्याप्रति सरकारची वचनबद्धता अधोरेखित करतो. त्याच दिवशी, पंतप्रधान मोदी यांनी गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ आणि बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोनेरू हंपी यांसारख्या सांस्कृतिक प्रतीकांची भेट घेतली, ज्यातून कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रांत उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यावर पंतप्रधानांचा भर असल्याचे दिसून येते.
३ जानेवारी रोजी, पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत मूळ जागी, नव्याने बांधलेल्या १,६७५ सदनिका हस्तांतरित केल्या, ज्यामुळे हजारो कुटुंबांची राहण्याची उत्तम सोय झाली आहे. सुरजमल विहार येथील ईस्टर्न कॅम्पस, द्वारका येथील वेस्टर्न कॅम्पस आणि नजफगढमधील वीर सावरकर महाविद्यालय यांसह ६०० कोटींहून अधिक खर्चाच्या तीन परिवर्तनात्मक शैक्षणिक प्रकल्पांची पायाभरणीही त्यांनी केली. शैक्षणिक पायाभूत सुविधा वाढवणे आणि भावी पिढ्यांना प्रेरित करणे, हा या प्रकल्पांचा उद्देश आहे. ४ जानेवारी रोजी ग्रामीण भारत महोत्सवादरम्यान ग्रामीण विकासाप्रति सरकारची वचनबद्धता केंद्रस्थानी होती, हा जीआय-प्रमाणित ग्रामीण उत्पादनांना प्रोत्साहन तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न होता. हा उपक्रम ग्रामीण भारताला सशक्त बनवण्याच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेत समाकलित करण्याच्या उद्दिष्टाला अनुरूप आहे. त्याचबरोबर, पंतप्रधान मोदी यांनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्यासह जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान अग्रणींशी संवाद साधला, ज्यांनी भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित पायाभूत सुविधांमध्ये ३ अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा केली. या चर्चांमध्ये स्वदेशी नवोन्मेषाला चालना देणे आणि स्वयंपूर्ण तंत्रज्ञान परिसंस्था उभारणे यावर प्रामुख्याने भर होता. ५ जानेवारी रोजी, साहिबाबाद आणि अशोकनगर यांना जोडणाऱ्या नमो भारत ट्रेन कॉरिडॉरचे उद्घाटन तसेच ओडिशा, तेलंगणासह जम्मू आणि काश्मीरमधील विविध रेल्वे पायाभूत सुविधांचा विकास यामुळे पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळाली. हे प्रकल्प म्हणजे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली वाहतुकीच्या जाळ्याच्या आधुनिकीकरणात भारत करत असलेल्या वेगवान प्रगतीचे प्रतीक आहेत.
७ जानेवारी रोजी, पंतप्रधान मोदी यांनी आंध्र प्रदेशमध्ये दोन महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभ केला; आयात केल्या जाणाऱ्या औषधी घटकांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी १,८७७ कोटींचा ‘बल्क ड्रग पार्क’ उपक्रम आणि दररोज १,५०० टन हरित हायड्रोजनचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट असलेले ‘ग्रीन हायड्रोजन हब’; या उपक्रमांमुळे नवीकरणीय ऊर्जा आणि औषध निर्मिती क्षेत्रात भारताला आघाडीचे स्थान मिळाले आहे. ९ जानेवारी रोजी ‘जीनोम इंडिया’ प्रकल्पाच्या उद्घाटनासह विज्ञान क्षेत्रात भारताने एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे, जे भारतीयांच्या अनुवांशिक विविधतेला मॅप करेल आणि अनुवांशिक विकारांवर आरोग्यसेवा उपायांना चालना देईल. त्याच दिवशी, पंतप्रधान मोदी यांनी भुवनेश्वर येथे प्रवासी भारतीय दिवस संमेलनाला संबोधित केले, परदेशस्थ भारतीय समुदायाच्या उपलब्धी आणि जागतिक स्तरावरील त्यांचे योगदान साजरे केले. १२ जानेवारी रोजी, पंतप्रधान मोदी राष्ट्रीय युवा दिन आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’मध्ये सहभागी झाले. या उपक्रमाने युवा नवोन्मेषक आणि यशस्वी व्यक्तींना विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी आणि विकसित भारताची कल्पना मांडण्यासाठी एकत्र आणले, ज्यातून युवकांना सक्षम बनविण्याप्रति सरकारच्या वचनबद्धतेला दुजोरा मिळाला.
१३ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन केले, ज्यामुळे संपर्क व्यवस्था सुधारली आणि राष्ट्रीय सुरक्षा वाढवण्याबरोबरच पर्यटनाला चालना दिली. त्यांनी श्रमिक आणि अभियंत्यांशी वैयक्तिकरित्या संवाद साधला तसेच त्यांच्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याचदिवशी संध्याकाळी, त्यांनी भारताच्या सांस्कृतिक एकात्मता आणि वारशावर भर देत विविध समुदायांसोबत लोहरी, पोंगल आणि मकरसंक्रांत साजरी केली. १५ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी यांनी आणखी एक मैलाचा दगड पार केला. नवीन युद्धनौका आणि पाणबुड्यांसह प्रगत लढाऊ जहाजे भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली, ज्यातून भारताची वाढती सागरी क्षमता प्रतिबिंबित होते. या युद्धनौकांच्या समावेशामुळे हिंद महासागरातील एक प्रबळ शक्ती म्हणून भारताची स्थिती मजबूत झाली असून संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताप्रति सरकारच्या वचनबद्धतेचा हा दाखला आहे. १६ जानेवारी रोजी, भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदींनी पाहिलेले आणखी एक स्वप्न साकार झाले, अंतराळात दोन उपग्रहांना एकमेकांशी जोडण्याच्या यशस्वी प्रात्यक्षिकासह इस्रोने आणखी एक मैलाचा दगड गाठला. पुढील काही वर्षांमधील भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांसाठी ही एक महत्त्वाची पायरी आहे. अवघ्या १५ दिवसांमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली २०२५ ची एक परिवर्तनकारी सुरुवात झाली आहे. वैज्ञानिक प्रगती आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांपासून ते युवा सक्षमीकरण आणि सांस्कृतिक उत्सवापर्यंत, त्यांच्या प्रत्येक कृतीतून विकसित भारताचे दर्शन घडते. जसे पंतप्रधान मोदी म्हणाले, “एकत्रितपणे, आम्ही विकसित भारताला आकार देत आहोत, जिथे उज्ज्वल भविष्याच्या उभारणीत प्रत्येक नागरिक महत्त्वाची भूमिका बजावत आहे.”