ऋतुराज – ऋतुजा केळकर
अच्युतानन्त गोविंद
नामोच्चारण भेषजात
नश्यन्ति सकलं रोगा:
सत्य सत्य वदाम्यहम
हा एक असा मंत्र आहे की, ज्यामुळे रोग नष्ट होऊन शरीर सुदृढ होते असे मंत्र शास्त्रात सांगितलेले आहे. आता आपल्यातले कितीतरी जण असं म्हणतील जर मंत्रसामर्थ्याने रोग बरे होऊ शकत असतील तर मग हे डॉक्टर्स आणि वैदकीय शास्त्र याची काय आवश्यकता? पण वेद पुराणानुसार कित्येक गोष्टींकडे पहिले तर मंत्रशास्त्राचे महत्त्व आपणास पटेल.
बरं क्षणभर आपण मंत्रशास्त्र बाजूला ठेऊन शब्द सामर्थ्याबद्दल विचार करू या. पूर्वापार असं म्हटलं जात की, पोटतिडकीने एखादी गोष्ट उच्चारली की ती कालांतराने खरी ठरते. आज भानगडचा किल्ला हे एक उत्तम उदाहरण आहे. असं सांगितलं जातं की तेथील माधोसिंग या राजाने या किल्ल्याचे बांधकाम केले, तेव्हा संत बाळूनाथ या त्यांच्या धर्मगुरूंनी असे सांगितले की, ‘‘किल्ल्याची सावली माझ्या आश्रमावर पडता कामा नये” पण राजाने ते ऐकले नाही आणि रागाने धर्मगुरूने संपूर्ण भानगडला शाप दिला. त्या सुंदर राज्याचे रूपांतर एका स्मशानात झाले. आजही संध्याकाळनंतर तेथे जाण्यास मनाई आहे. आता यात भूतप्रेत यांचा किती संबंध आहे हे बाजूला ठेऊन जर फक्त त्या शापाबद्दल विचार केला तर असं लक्षात येईल की, शब्द जे एखाद्या भावनेतून मग ती सुखद असो अगर आंतरिक वेदनेच्या भावातून म्हणजेच अंतरात्म्यातून उमटतात. ते शाप किंवा वरदान बनून आपल्या जीवनात परिवर्तीत होतात. म्हणूनच असेल कदाचित पण पूर्वापार असे सांगितले जाते की कुठलाही शब्द हा जपून उच्चारावा.
आता साधा ‘विठ्ठल’ या शब्दोच्चाराने आपल्या हृदयाचे ठोके नियंत्रित तर होतातच पण रक्तदाब देखील नियंत्रणात येतो. राम नामाने आपल्या मेंदूतील नसा मोकळ्या होऊन विचारांवर नियंत्रण होते. यात मी इतकेच म्हणेन की, शब्दांना नियंत्रित करण्यापेक्षा आपण आपल्या विचारांना नियंत्रित करणे गरजेचे आहे. साध्या कोवळ्या सूर्यकिरणांचा देखील आपल्या मानसिकतेवर परिमाण होत असतो. समुद्राची भरती आहोटी असो अगर चंद्राच्या कलांचा म्हणजे पौर्णिमा अगर अमावास्या असो ते सर्व वातावरणावर परिणाम करतात.
विचारांच्या तसेच शब्दांच्या उच्चाराने वातावरणाच्या लहरी या बदलतात. इंद्रिय शक्तीचे तेज या शब्दोच्चाराने बदलते. आत्मस्वरूपाचे प्रकटीकरण होऊन अंतरंगातील तेज रूपाचा वास हा सर्वत्र होऊ लागतो तो या शब्दोच्चाराने म्हणजेच मंत्रांच्या उच्चाराने. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूताने आपले शरीर बनलेले आहे. हे विशिष्ट प्रकारच्या उच्चारांनी या जड शरीरात चैतन्य शक्ती जागृत होते. अगदी ‘केन’ या उपनिषदात सांगितल्याप्रमाणे, यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षूंषि पश्यति।
म्हणजेच जे सध्या डोळ्यांनी दिसत नाही ते या मंत्र सामार्थ्यांनी पाहण्याची शक्ती निर्माण होते. आता यात कुणी म्हणेल की हे फक्त आपल्याच हिंदू मंत्र शास्त्रापुरतेच मर्यादित आहे का? तर नाही हा नियम अखिल ब्रम्हांडास लागू होतो. भाषा कोणतीही असो मनापासून म्हणजे चिंतन करून जे ऐहिक आणि पारमार्थिक कल्याणाकरिता लोकमंगल कार्याकरिता भक्तिभावाने मंत्रपठण करतो त्यांना मंगलकारक असा अनुभव आल्याशिवाय राहत नाही.
म्हणूनच आधिभौतिक, आधिदैविक तसेच आध्यात्मिक मार्गाने फक्त संसारिक मोहमायेतून दूर जाण्याकरिता म्हणजे मोक्षपदाकडे जाण्याकरिता नव्हे तर जय, लाभ आणि यश देण्याकरिता तसेच मनातील अनेकानेक विचारांच्या मंथनाचे खंडन होऊन त्याची मलीनता दूर होऊन जीवनाच्या इंद्रधनुला नवीन रंग प्राप्त होण्याकरिता शब्द सामर्थ्याचा तसेच मंत्र शास्त्राचा वापर जरूर करा.