Monday, May 19, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

जामखेडमध्ये चारचाकी विहिरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

जामखेडमध्ये चारचाकी विहिरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

अहमदनगर : अहमदनगरच्या जामखेड परिसरातील जांबवाडी येथे रस्त्या लगतच्या विहिरीत चारचाकी वाहन कोसळून झालेल्या अपघातात ४ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.


यासंदर्भातील माहितीनुसार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने चारचाकी वाहन थेट विहिरीत जाऊन पडले. त्यामुळे वाहनातील ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या वाहनात रामहरी गंगाधर शेळके, किशोर मोहन पवार, अशोक विठ्ठल शेळके आणि चक्रपाणी सुनिल बारस्कर आदींचा समावेश होता.


अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर कठडा व पायऱ्या नसलेल्या या विहिरीत दोरखंड लावून काही युवकांना उतरवले. त्यांनी बुडालेल्या चारही युवकांना विहिरीतून बाहेर काढले. यावेळी मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. पोलीस निरीक्षक महेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी असलेली गर्दी हटवली.


सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व समर्थ हॉस्पिटलच्या रूग्णवाहिकेने चारही जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हे चारही मृतदेह शवविच्छेदन गृहात शवविच्छेदनसाठी नेण्यात आले. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Comments
Add Comment