अहमदनगर : अहमदनगरच्या जामखेड परिसरातील जांबवाडी येथे रस्त्या लगतच्या विहिरीत चारचाकी वाहन कोसळून झालेल्या अपघातात ४ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
यासंदर्भातील माहितीनुसार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने चारचाकी वाहन थेट विहिरीत जाऊन पडले. त्यामुळे वाहनातील ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या वाहनात रामहरी गंगाधर शेळके, किशोर मोहन पवार, अशोक विठ्ठल शेळके आणि चक्रपाणी सुनिल बारस्कर आदींचा समावेश होता.
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर कठडा व पायऱ्या नसलेल्या या विहिरीत दोरखंड लावून काही युवकांना उतरवले. त्यांनी बुडालेल्या चारही युवकांना विहिरीतून बाहेर काढले. यावेळी मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. पोलीस निरीक्षक महेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी असलेली गर्दी हटवली.
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व समर्थ हॉस्पिटलच्या रूग्णवाहिकेने चारही जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हे चारही मृतदेह शवविच्छेदन गृहात शवविच्छेदनसाठी नेण्यात आले. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.