मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मासोबत दिल्ली विमानतळावर गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली विमानतळावर अभिषेक शर्मासोबत जे काही झाले, ते त्याने सोमवार (13 जानेवारी) रोजी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे याची माहिती दिली.
दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या स्टाफने अभिषेक शर्माशी गैरवर्तन केले. याबाबत त्याने इन्स्टावर स्टोरी पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला.अभिषेक शर्मानं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं की, “दिल्ली विमानतळावर इंडिगोसोबत मला सर्वात वाईट अनुभव आला. कर्मचाऱ्यांचं, विशेषतः काउंटर मॅनेजर सुष्मिता मित्तलचं वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य होतं. मी वेळेवर योग्य काउंटरवर पोहोचलो, पण त्यांनी मला अनावश्यकपणे दुसऱ्या काउंटरवर पाठवलं. “अभिषेकनं पुढे लिहिलं, “नंतर मला सांगण्यात आलं की चेक-इन बंद आहे, ज्यामुळे माझी फ्लाइट चुकली. माझ्याकडे फक्त एक दिवस सुट्टी होती, जी आता पूर्णपणे वाया गेली आहे. परिस्थिती आणखी वाईट झाली, कारण ते कोणतीही मदत देत नाहीत. हा माझा सर्वात वाईट एअरलाइन अनुभव आहे.” अभिषेक शर्माने दावा केला की त्याला अनावश्यकपणे काउंटरमध्ये पाठवण्यात आलं, ज्यामुळे त्याची फ्लाइट चुकली. त्यानं विमानळावरील एका कर्मचाऱ्याचंही नाव घेतलं आणि यावर कारवाईची मागणी केली आहे.
अभिषेक शर्माची नुकतीच इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघात निवड झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो संजू सॅमसनसोबत भारतीय डावाची सुरुवात करताना दिसणार आहे, अशी अपेक्षा आहे. अभिषेक शर्माचा सध्याचा फॉर्म उत्कृष्ट आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये धावा केल्या आहेत. या दोन्ही देशांतर्गत स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल १० फलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्धही अभिषेक शर्मा हाच फॉर्म कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे.