सध्या जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये पराकोटीचा संघर्ष दिसतो. नोकरी-धंद्यामध्ये संधी न मिळणे, क्षमता असूनही ती सिद्ध करण्याचा मार्ग न सापडणे यांसारखे नानाविध विषय युवावर्गाच्या चिंतेमध्ये भर घालत आहेत. लोकांच्या आहे त्या नोकऱ्या जात आहेत. त्यामुळेच येत्या काळातही हा वर्ग चिंताग्रस्त राहणार, याविषयी शंका नाही. पण नव्या वर्षामध्ये त्यातील अनेक प्रश्न धसास लागतील, असेही मला वाटते.
डॉ. राजेंद्र बर्वे, प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ
नवीन वर्ष सुरू होत असताना दिवसेंदिवस जटिल होत जाणाऱ्या मानसिक समस्या आणि अस्वास्थ्याकडे अधिक गांभीर्याने बघण्याची गरज कधी नव्हे इतक्या तीव्रतेने जाणवत आहे. त्यामुळेच सरत्या वर्षाला निरोप देताना या विषयाची व्यापकता समजून घ्यायला हवी. त्यायोगे आपण चांगल्या मनोवस्थेनिशी नववर्षाचे स्वागत करू शकू. आतापर्यंत मानसिक आरोग्य ही इतर आरोग्याच्या बरोबर जाणारी एखादी गोष्ट होती. याच दृष्टीने सगळे त्याकडे बघत होते. मात्र कोव्हिडनंतरच्या काळात परिस्थिती बदलली. मानसिक अस्वास्थ्य असल्यास केवळ मानसिक स्थितीच बदलते असे नाही तर तुमच्या आयुष्याचा अनुभव कंटाळवाणा, निराशाजनक असतो हे देखील समजले. एवढेच नव्हे तर, यामुळे होणारे शारीरिक आजार, मनाचा, शरीराचा दुबळेपणा, वाढता संसर्ग यांसारखे धोकेदेखील प्रकर्षाने समोर आले आणि हे विषय घुसळून निघाले. याचा अर्थ आता मानसिक रुग्ण वाढले आहेत, असा होत नाही पण मानसिक त्रास नक्कीच वाढला आहे. त्यामुळेच नव्या वर्षाचे स्वागत करताना ही मन:स्थिती सुधारण्याचा प्रयत्न व्हायला हवा.
पूर्वी १० ते १५ टक्के लोकांना इतर व्याधींप्रमाणेच काही मानसिक आजार होते. त्यावर आम्ही इलाज करत आलो आहोत. मात्र आता हे प्रमाण जवळपास ४० टक्क्यांपर्यंत पोहोचले असून या लोकांना कोणाच्या वा कोणत्या तरी मदतीची गरज लागत असल्याचे समोर आले आहे. तपशिलात जाऊन विचार करता आपल्या देशामध्ये या ४० टक्क्यांमध्ये करोडो लोकांचा समावेश होतो, हे स्पष्ट आहे. अर्थातच आधी उल्लेख केल्याप्रमाणे यातील सगळेच मनोरुग्ण नाहीत. मात्र त्यांना मानसिक अस्वस्थपणा जाणवण्याइतका आहे. त्याची कारणे वेगवेगळी आहेत. कौटुंबिक विवाद, शारीरिक व्याधी, व्यवसाय-धंद्यातील अडचणी आदी कारणांमध्ये कमालीची वाढ झाल्याचा हा परिपाक आहेच, खेरीज मानसिक आरोग्य धोक्यात येण्याचे वयही आता कमी कमी होत आहे. यात साधारणपणे ३५ ते ४० वर्षे वयोगटाचा समावेश नोंद घेण्याइतका वाढला आहे, कारण त्यांना पुढच्या पिढीची सर्वाधिक चिंता आहे. म्हणूनच नव्या वर्षात प्रवेश करताना या पिढीने मानसिक आरोग्य जपण्यासाठी विशेष प्रयास घेण्याची गरज लक्षात घ्यायला हवी. हा वर्ग भरडला जाण्याला वाढती स्पर्धादेखील कारणीभूत आहे. सध्या जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये पराकोटीचा संघर्ष दिसतो. नोकरी-धंद्यामध्ये संधी न मिळणे, क्षमता असूनही ती सिद्ध करण्याचा मार्ग न सापडणे असे नानाविध विषय या वर्गाच्या चिंतेमध्ये भर घालत आहेत. लोकांच्या आहेत त्या नोकऱ्या जात आहेत. त्यामुळेच येत्या काळातही हा वर्ग चिंताग्रस्त राहणार, याविषयी शंका नाही. पण नव्या वर्षामध्ये यातील काही प्रश्न धसास लागतील असेही मला वाटते. जसे की, ‘एआय’चे पुढे काय होणार याची आपल्याला या वर्षी पूर्ण कल्पना येईल आणि आपल्या आयुष्यातील त्याचे स्थान निश्चित करणे सोपे होईल. दुसरी बाब म्हणजे सरत्या वर्षामध्ये देश आणि राज्य पातळीवरील दोन महत्त्वाच्या निवडणुकांमधून आपण बाहेर आलो आहोत. आता दोन्ही सरकारे स्थिरावली आहेत.
ग्रामपंचायती वा नगर परिषदांच्या निवडणुका प्रस्तावित असल्या तरी त्याचा परिणाम इतका व्यापक नसेल. या अानुषंगाने २०२४ मध्ये बघायला मिळालेली अस्वस्थता २०२५ मध्ये बघायला मिळणार नाही. सध्याच्या स्थिरतेबरोबर आपण काही करू शकतो का, याचा विचार आणि विश्वास आता लोकांच्या मनात निर्माण होईल आणि मानसिक स्थिती सुधारेल, अशी आशा आहे. आता समाज पुढे घडणाऱ्या सकारात्मक गोष्टींचा विचार करु शकेल. त्या दृष्टीनेही २०२५ महत्त्वाचे ठरेल. मधल्या काही काळात नोकऱ्या जाण्याची भीती खूप मोठी होती. मात्र येणाऱ्या वर्षामध्ये नोकरी-धंद्याचे वेगळे आयाम निर्माण होताना दिसतील. सामाजिक स्थितीचा आढावा घेताना बघायला मिळणारा वा व्यक्त होणारा हा बदलही अत्यंत महत्त्वाचा म्हणावा लागेल. जसे की, आता आयटीमध्ये नव्या संधी निर्माण होत असल्याची चर्चा असून ती युवावर्गातील मानसिक अस्वास्थ्य दूर करण्यास पूरक ठरताना दिसत आहे. हे प्रमाण वाढेल तस तसे मानसिक आरोग्यविषयक प्रश्नही कमी कमी होतील. वैयक्तिक पातळीवर बघायचे तर २०२५ साठीच नव्हे तर पुढच्या काळासाठी मानसिक आरोग्य तोलून धरणारे खांब मजबूत करणे ही निकड असणार आहे. यातील पहिला खांब शारीरिक स्वास्थ्याचा आहे. त्यामुळेच येत्या काळात आपल्याला शरीराचे नियमन करणे गरजेचे ठरेल.
रोजचा व्यायाम, ध्यानधारणा याकडे लक्ष देऊन हे नियमन साधता येईल. यासाठी फार नव्हे तर दिवसातील २० मिनिटे स्वत:साठी दिली तरी पुरेसे होईल. कितीही काम असले तरी प्रत्येकाने हा वेळ स्वत:साठी राखून ठेवायलाच हवा. या २० मिनिटांमधील १३ मिनिटे स्वस्थ बसून श्वासावर लक्ष ठेवावे. स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा. यावेळी डोक्यात कोणताही विचार नसावा वा कोणत्याही प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न नसावा. वर्षाच्या अखेरपर्यंत आपल्याला काय मिळवायचे आहे, साधायचे आहे हे एकदा ठरले की मन नकळत त्यासाठी सज्ज होते आणि रोज ठेवला गेलेला हा हिशेब आपल्याला सकारात्मक वळणावर घेऊन जातो. आपण घाईत असतो. डोक्यात अनंत विचार सुरू असतात. पण त्याचवेळी सिग्नलजवळ छोटी मुले येतात आणि पैसे मागतात. पलीकडच्या पदपथावर या जगातील दु:खापासून दूर असणारी काही निरागस मुले उघड्या अंगाने खेळत असतात. हातात मिळालेल्या छोट्याशा तुटक्या-फुटक्या खेळण्याशी खेळण्यात, एकमेकांशी मस्ती करण्यात, जमिनीवरचे उचलून खाण्यात त्यांचा वेळ जात असतो. प्राप्त परिस्थितीने शिणलेल्या माणसांनी कधी तरी या परिस्थितीची जाणीव नसणाऱ्या मुलांकडेही बघायला हवे. जमली तर मदत करायला हवी. पैसे न देता जवळ बसवून त्यांना दोन घास द्यायला हवेत. ही प्रत्येक कृती आपल्या मनाची अवस्था सुधारून जाईल, याची खात्री बाळगा कारण या छोट्याशा कृतीतून आपण खूप काही जमा करत असतो. समाधान घेत असतो. यालाच मी कृतज्ञता व्यायाम म्हणतो, जो आपल्यापैकी प्रत्येकाने करायला हवा. याच पद्धतीने खिडकीत येणाऱ्या पक्ष्यांच्या करामती बघण्याने, रस्ता ओलांडताना गोंधळलेल्या वृद्धांना हात दिल्याने, एकट्यांची क्षणभर सोबत केल्याने, जवळच्या नातेवाइकांची विचारपूस केल्याने, अनेक दिवस संपर्कात नसणाऱ्या मित्रमंडळींना एखादा कॉल केल्यानेही आपण मोलाचे अनेक क्षण साठवू शकतो. वरकरणी ही बाब अत्यंत सामान्य वाटू शकते, पण याचे प्रमाण आणि प्रभाव दीर्घकाळ टिकणारा असतो. तो पैशात न मोजता येणाऱ्या सुखाचे मनावर लेपन करून जातो. मनातील शंका-कुशंकांवर हलकी फुंकर घालून जातो. म्हणूनच २०२५मध्ये असे निर्लेप सुख मिळवण्याचा प्रयत्न करू या आणि वधारलेल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यानिशी नव्या काळाचा आनंद लुटू या.