सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५मधील शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ६ विकेट राखत मात केली. सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी निकाल लागला. या सामन्यात तिसऱ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी १६० धावांचे आव्हान दिले होते.
ऑस्ट्रेलियाने हे आव्हान ४ विकेट गमावत पूर्ण केले आणि सामना जिंकला. यासोबतच ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-१ अशी जिंकली. यासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचे भारताचे स्वप्न भंग झाले. ऑस्ट्रेलियाच्या संघाने फायनलमध्ये एंट्री मारली आहे. आता त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
तिसऱ्या दिवशी केवळ अर्ध्या तासातच भारतीय संघ ऑलआऊट झाला होता. त्यांना केवळ १५७ धावाच करता आल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने फलंदाजी सुरू केली. लंचच्या आधी ऑस्ट्रेलियाचे झटपट तीन विकेट पडले. मात्र त्यानंतर केवळ एकच विकेट बाद करण्यात भारतीय संघाला यश मिळाले. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे तिसऱ्या दिवशी खेळू शकला नाही.
याआधी पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने १८५ धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १८१ धावा केल्या. पहिल्या डावातील चार धावांच्या आघाडीवर भारताने दुसऱ्या डावास सुरूवात केली मात्र दुसऱ्या डावातही भारताचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यांना दुसऱ्या डावात केवळ दीडशे धावांचाच टप्पा गाठता आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी १६० इतके माफक आव्हान मिळाले. ऑस्ट्रेलियाने हे माफक आव्हान सहज पूर्ण केले.
मालिका विजय
सिडनी कसोटीतील विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ असा विजय मिळवला आहे. पर्थमधील पहिली कसोटी भारताने जिंकली होती. हा सामना भारताने २९५ धावांनी जिंकला होता. भारताच्या धमाकेदार सुरूवातीनंतर वाटले होते की भारत ही मालिका जिंकेल. मात्र दुसऱ्याच कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा १० विकेटनी पराभव केला. त्यानंतर ब्रिस्बेनमधील तिसरी कसोटी अनिर्णीत ठरली. मेलबर्नमधील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने १८४ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर आता सिडनीमध्येही कसोटी जिंकली.