उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
ठाणे : मागील सरकारच्या अडीच वर्षातील पहिल्याच सहा महिन्यात महाराष्ट्राला उद्योगात (Maharashtra Industry) एक नंबरला आणला. त्याआधीच्या लॉकडाऊन सरकारमुळे काही उद्योग राज्याबाहेर गेले. मात्र,यापुढे एकही उद्योग महाराष्ट्रातून जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यासंदर्भात संबंधित मंत्र्यांनी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. ठाण्यात सुरू असलेल्या लक्षवेधच्या दोन दिवसीय ‘बिझनेस जत्रा’चा (Business fair) समारोप एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत झाला.
Mhada Lottery : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या नोंदणीसाठी उद्या शेवटचा दिवस!
त्यावेळी उपस्थित उद्योजकांना संबोधित करताना ते बोलत होते.३ ते ४ जानेवारी या कालावधीमध्ये आयोजित लक्षवेधच्या चौथ्या बिजनेस जत्रेमध्ये लघुउद्योजक तसेच व्यावसायिकांचे १५० च्या आसपास स्टॉल लागले होते. दोन दिवसात ९ हजार जणांनी भेट दिल्याची माहिती आयोजक अतुल राजोळी, गणेश दरेकर यांनी सांगितले. या बिझनेस जत्रेच्या समारोप दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन लघु उद्योजकांना उद्बोधक मार्गदर्शन केले. प्रारंभी “उद्योगाच्या घरी लक्ष्मी वास करी” “एकमेका साह्य करू…अवघे होऊ श्रीमंत” अशी कोटी करून, व्यवसायात प्रामाणिकपणा असला पाहिजे, कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. कुठलेही काम, कुठलीही संधी मिळाली की त्या संधीचे सोने करायचे. असा कानमंत्र उद्योजकांना दिला. मुख्यमंत्री असताना ज्या ज्या दुकाने, व्यवसायांची उद्घाटने केली. त्यांची व्यवसायात वृद्धी झाली. त्यामुळे खरं म्हणजे रॉयल्टी घ्यायला हवी होती. पण मी विदाऊट रॉयल्टी काम करणारा माणुस आहे. असे शिंदे यांनी स्पष्ट करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला. याची आठवण जागवताना ते काम फार कठीण होते, याची कबुली एकनाथ शिंदे यांनी देताना पूर्वीच्या सर्व बंद बंद करणाऱ्या लॉकडाऊन सरकारवर अनुल्लेखाने टिका केली.महायुतीचे सरकार असताना अडीच वर्षात एकही सुट्टी न घेणारा मुख्यमंत्री होतो. पहिल्या सहा महिन्यात महाराष्ट्राला उद्योगात नंबर एकला आणला. तेव्हा,उद्योगमंत्र्यांना सांगितले आहे की यापुढे एकही उद्योग महाराष्ट्रातुन जाता कामा नये. सर्वच मंत्र्यांना सांगितले आहे. जर उद्योग गेला तर तुमची योग्य ती काळजी मी घेईन. अशी जाहीर तंबीच एकनाथ शिंदे यांनी दिली.