राणे म्हणजे विकास हे गेल्या अनेक पिढ्यांना माहिती असलेले समीकरण आहे. आता तर तीन राणे या सत्ताकारणात आहेत. याचा अर्थ पुढील पाच वर्षे विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे आणि त्याची झलक दिसायला सुरुवात झाली आहे. एकूणच २०२४ ने कोकणातील राजकारणाला नवा चेहरा दिला आहे आणि हा चेहरा फक्त भावनिक नव्हे तर विकासाचा, यशाचा आणि समृद्धीचा आहे.
अनघा निकम मगदूम
सन २०२४ या वर्षाची सुरुवात झाली तेव्हा कोकणातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती ती या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या मैदानात कोणाचा सामना रंगणार आहे ती.
सन २०१९ ते २०२४ या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक स्थित्यंतरे बघितली. २०१९ च्या निवडणुकीनंतरचा महायुतीमधला विश्वासघात पाहिला तसाच २०२२ मधील सत्तापालटही पाहिला. याच महाराष्ट्राने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या राज्यातील दोन प्रमुख प्रादेशिक पक्षातील मोठी फूट सुद्धा पाहिली होती. या सगळ्याच घडामोडीनंतर या बदलाला जनता जो प्रतिसाद देणार होती ते पाहण्याचे वर्ष म्हणजे २०२४ होते. शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष प्रमुखपद आणि पक्षचिन्ह जाणे याचा अर्थातच थेट परिणाम कोकणावर आणि त्यातही तळकोकणात होणार हे अटळ होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा पायाच कोकण होते. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तळ कोकणात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.
मात्र रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाने दावा केला आणि सगळी समीकरणे बदलून गेली. तब्बल ४० वर्षांनंतर हा मतदारसंघ भाजपाकडे आला होता. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला ही निवडणूक सोपी नव्हती हेही निश्चित होते. त्यात भाजपाने तत्कालीन केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आणि निवडणुकीचा चेहरा-मोहराच बदलून गेला. गेली ४० वर्षे शिवसेनेसाठी मतदान करणारा भारतीय जनता पक्षाचा मतदार उत्साहाने या निवडणुकीत सहभागी झाला. ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खा. नारायणराव राणे यांनी मोठे योगदान देत जिल्ह्याला आणि पर्यायाने कोकणाला जगाच्या नकाशावर नेले त्या राणे साहेबांसाठी सिंधुदुर्गसह रत्नागिरीतील मतदारांनी मोठ्या विश्वासाने मतदान केले आणि ४ जून २०२४ रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपाचे कमळ फुलले. राणे साहेबांनी ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांना पराभूत करत निलेशजी राणे यांच्या पराभवाला उत्तर दिले होते. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांनी उद्धव ठाकरे यांना कोकण कोणाचे आहे हे दाखवत कोकणातल्या राजकारणात भक्कम असलेले त्यांचे अस्तित्व दाखवून दिले.
लोकसभे पाठोपाठ विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपाचे निरंजन डावखरे हे विजयी झाले. त्या विक्रमी विजयात सुद्धा रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झाले.
त्यानंतर वेध लागले ते विधानसभा निवडणुकीचे! हिंदुत्व हाच श्वास आहे आणि हीच आमची ओळख आहे हे सांगत संपूर्ण राज्यात हिंदू धर्मासाठी कार्यरत असणाऱ्या आ. नितेशजी राणे यांचा देवगड-कणकवलीचा विजय निश्चित मानला जात होता. पण अवघ्या कोकणचे लक्ष लागून राहिले होते ते कुडाळ-मालवण विधानसभेकडे.
२०१४ ला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राणे परिवाराला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतरचा काळ हा अत्यंत संघर्षाचा होता. मात्र २०१४ ला प्रथमच आमदार झालेल्या नितेशजी राणे यांच्या रूपाने या संघर्षाच्या काळातही उद्याच्या विजयाच्या खुणा स्पष्ट दिसत होत्याच. पण त्यातच २०१४ ला कुडाळ-मालवणला झालेला पराभव हा जिव्हारी लागणाराच होता. खासदारकीच्या निवडणुकीतून विधानसभेकडे वळलेल्या निलेशजी राणे यांनी यासाठी हा मतदारसंघ २०१९ पासूनच पिंजून काढायला सुरुवात केली होती. प्रत्येक दिवस अगदी बारीक लक्ष ठेवून त्यांनी स्वतःच्या स्वभावाच्या विरुद्ध भूमिका घेत, कधी थेट तर कधी विरोधक गाफील असताना, कधी जोराचे तर कधी हळू धक्के देत विरोधकांना जेरीस आणले. निलेशजी राणे यांचा शिवसेना प्रवेश हा या संपूर्ण निवडणूक काळातला मोठा टर्निंग पॉइंट होता.
त्याचवेळी या निवडणुकीत दरवेळचा पॅटर्न राबवायचा, राणे परिवारावर यथेच्छ टीका करायची याचा पूर्ण प्लान उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तयार होता. म्हणून कधी स्वतः, कधी आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे अशा अनेकांनी तीनही मतदारसंघात येऊन राणे परिवारावर टीका केली. पण त्याला कुठलेच प्रत्युत्तर राणे परिवाराकडून आले नाही, उलट भाजपा-शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते विरोधकांना पराभव म्हणजे काय ते दाखवायचे या निर्धाराने सज्ज झाले. खा. राणे साहेब, आ. नितेशजी राणे, निलेशजी राणे, सौ. निलमताई राणे या सर्वांनी निष्ठावान पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सोबतीने अपरिमित कष्ट घेतले आणि २३ नोव्हेंबर २०२४ रेजी दोन्ही राणे सुपुत्र निवडणूक लढवून आमदार झाले. १० वर्षांनंतर पुन्हा एकदा कुडाळ-मालवण मतदारसंघात राणे विजयी झाले. मुलाने वडिलांच्या पराभवाचा बदला घेत एक वर्तुळ पूर्ण केले.
सावंतवाडीतून शिवसेनेचे दीपक केसरकर, रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीतून शिवसेनेचे योगेश कदम, चिपळूण येथून शेखर निकम यांच्यासह रत्नागिरी आणि राजापुरातून उदय सामंत आणि किरण सामंत हे दोघे सामंत बंधू सुद्धा निवडून आले आणि महायुतीने या दोन जिल्ह्यांसह संपूर्ण कोकणात घवघवीत यश मिळवले.
अपेक्षेप्रमाणे उदय सामंत यांना मंत्रीपद मिळालेच पण योगेश कदम यांना राज्यमंत्रीपद तर विजयाची हॅटट्रिक करणाऱ्या नितेशजी राणे यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद देत मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभाग देऊन किनारपट्टी समृद्धच नव्हे, तर सुरक्षेच्या दृष्टीने भक्कम करण्याची जबाबदारी नितेशजी राणे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपवली आहे.
कोकणातला लोकसभा आणि विधानसभेतील महायुतीचा महाविजय, उद्धव ठाकरे यांचा कोकणात ओसरलेला प्रभाव, तळ कोकणात फुललेले कमळ आणि खा. नारायणराव राणे, नितेशजी राणे आणि आ. निलेशजी राणे यांच्या रूपाने तिन्ही राणे यांचे इथल्या राजकारणातील जोरदार पुनरागमन ही गोष्ट २०१४ नंतर कोकणातले राजकारण ३६० अंशांनी पूर्णपणे फिरवणारे ठरले आहे.
राणे म्हणजे विकास हे गेल्या अनेक पिढ्यांना माहिती असलेले समीकरण आहे. आता तर तीन राणे या सत्ताकारणात आहेत. याचा अर्थ पुढील पाच वर्षे विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे आणि त्याची झलक दिसायला सुरुवात झाली आहे. एकूणच २०२४ ने कोकणातील राजकारणाला नवा चेहरा दिला आहे आणि हा चेहरा फक्त भावनिक नव्हे तर विकासाचा, यशाचा आणि समृद्धीचा आहे.