ऋतुजा केळकर
‘फांदीवरचे चांदणे ओच्यात माझ्या
धुळवाटा भूतकाळाच्या…
पोचवती मज …
कलामंडपी भविष्याच्या …’
शकराच्या काळ्याभोर पिंडीवर अभिषेक करता करता अचानक नजरेसमोर अर्धनारीनटेश्वराची मूर्ती आली आणि जाणवलं की, उजवीकडे असलेल्या शंकराच्या छबीमध्ये भविष्याची चाहूल असते तर डावीकडील पार्वतीच्या छबीमध्ये भूतकाळाचे प्रतीक आहे. शिव पुराणातदेखील याचे विस्तृत वर्णन केलेले आहे. मग काळाचे मणी अत्यंत वेगाने सरकत असताना भूत-भविष्य यांची सांगड ती कशी घालावी. २०२४ हे वर्ष आजपासून बरोबर दोन दिवसांनी म्हणजे ३१ डिसेंबर २०२४ ला संपणार आणि इंग्रजी कालखंडानुसार नवीन वर्षाची म्हणजेच २०२५ ची सुरुवात होणार. नवीन वर्ष म्हणजेच नवीन संकल्पना, नवीन योजना. पण हातातून निसटून गेलेल्या २०२४ या वर्षाचे काय?
खर सांगायचं तर सरत्या वर्षाच्या घडामोडींचा आढावा म्हणजे रामायणातील कांचनमृगाच्या संमोहनचा नव्हे, तर देहोत्सवाचा सलज्ज शालीन असा प्रयत्न की, जो केवळ नवीन वर्षाच्या स्वागताला चैतन्याची एक धुळवाट दाखवण्याचा प्रयत्न.
कुठून आणि कशी सुरुवात करावी तेच कळत नाही. २०२४ हे तेच वर्ष आहे की, ज्या वर्षात रामलल्लाची अयोध्येत थाटामाटात पुनर्स्थापना झाली, त्या रामलल्लाची जो एकवचनी एकबाणी आणि एकपत्नीव्रती होता. त्याच भारत भूवर तीस हजार पेक्षाही जास्त स्त्रियांच्या विटंबनेच्या घटना या वर्षात घडल्या, या सारखे दुर्दैव नाही. ज्या हिंदुस्थानात स्त्रीला देवीचा दर्जा देऊन तिला पूजले जाते तिथेच तिची होत असलेली ही विटंबना कुठेतरी विचार करायला लावणारी आहे. पण चांगली बाजू अशी की जगभरात महिला आणि लिंग समानतेसाठीच्या चळवळी वेगाने वाढत आहेत आणि महिला अधिकार, समान वेतन आणि लैंगिक हिंसाचाराविरोधातील चळवळी देखील सर्वच जगात मुळे धरू लागली आहेत. २०२५ या वर्षात माणसाच्या ओठावर आणि हृदयात प्रेमाचे तसेच माणुसकीचे गीत ओठावर असुदे.
वर्ष २०२४ खरचं खूप वेगळं होतं सर्वांकरिता. एक प्रवास आता संपत आलाय. अगदी तसाच जसा अचानकपणे परवा ‘तबला अबोल झाला’ होय पंडित झाकीर हुसेन हे काळाच्या पडद्याआड गेले. पाठोपाठ श्याम बेनेगल यांनी देखील या जगाचा निरोप घेतला, घर सोडून जाताजाता लाडक्या लेकीने जणू जाता जाता तिच्या आवडीच्या गोष्टी न्याव्यात अगदी तशाच सरत्या वर्षाने संगीत आणि साहित्त्य या क्षेत्रांना दिलेला हा मोठा झटका होता. काय बरं वाटलं असेल या जात्या आत्म्यांना मग सहज शब्द सुचले …
‘वक्त की धूप में … तपता हुआ सहेरा…
जिंदगी केहेलाता है …
और … फिसलती पलों की रेत में …
मेरा आना-जाना … होता है …’
आयुष्य कसं घडवायचं हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. रेशमाचा किडा बनून मरतामरता जगाला रेशीम देऊन की, वाळवी बनून आपल्या बरोबरच आयुष्याची संपूर्ण गुलमोहर बागेची वैराण करायची…!
कसं आहे ना की आरंभ आणि अंत याचं चिंतन केलं, तर लक्षात येईल की, आरंभ असो अगर अंत. काहीही होत असताना ते पाहत असताना निसर्गाच्या कुशीत पाना फळाच्या अलवारपणात म्हणू नका, उंचच उंच झाडांच्या गाभ्यांमध्ये म्हणू नका, अगदी खोल खोल गेलेल्या मुळात म्हणू नका किंवा गुढ गंभीर सांजवेळेत म्हणू नका. एक अंतरात्मा ढवळून टाकणारी तगमग चालू असते मग ते काहीही असूदे जन्म किंवा मृत्यू, वर्षाखेर किंवा वर्षारंभ. ती तगमग, तो ज्वालामुखी प्रत्येक सजीव निर्जीवात घडतोच, कुणाची साथ सुटते तर कुणी नवीन साथी मिळतो. कुणाचं अस्तित्व लयास पावतं, तर कुणी नव्याने प्राक्तनगंधी प्रश्नांची उत्तरे घेऊन चांदण्या पावली आयुष्यात शुभ संकेत देते. काळच तो, घट्ट मुठीतील वाळू सारखा हळूहळू मुठ रिकामी करणारच आणि पाठी ठेऊन जाणार त्या फक्त आठवणींच्या गोंदण खुणा…! मग जेव्हा जेव्हा आपण पाठी वळून पाहू तेव्हा तेव्हा माझ्याच शब्दात सांगायचं झालं तर आपण म्हणू …
‘ऋतुभारणीच्या गोंदणावर …
नव्या वर्षाचा झुलता गुलमोहर …
नव्या मोगरी गंधाचा पाझर …
देह पुष्करणीत फुलवत गेला …
आज सांताबाबा लहान मुलांना खूप सुंदर सुंदर भेटवस्तू देतो. आपणही त्या ब्रम्हांडाच्या सांताबाबाकडे आपल्याकरिता सुकर, सुबक आणि देखणं आयुरारोग्य मागूया. असं म्हणतात की, चांगल्या मनाने आणि चांगल्या करिता जर काही याचना केली, तर ती देव नेहमीच पूर्ण करतो. म्हणूनच आपल्याही आयुष्याची रांगोळी रेखीव होण्याकरिता जात्या २०२४ ला हसतमुखाने निरोप देऊन येणाऱ्या सुवर्णमयी २०२५ चे असे स्वागत करूया की,
‘आयुष्याची रांगोळी …
तुझ्या नी माझ्या …
कधी ठिपक्यांची तर …
कधी रेषांची …
पूर्णाकृती एका …
सुरेल बंदिशी सारखी …’